कष्टे करोनि घसरावे म्लेंच्छावरी...

    08-May-2025   
Total Views |
कष्टे करोनि घसरावे म्लेंच्छावरी...

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एकीकडे भारतीय सैन्य दले पाकला बेचिराख करत आहेत, त्याचवेळी भारतातील राजकीय पक्षांचीदेखील एकजूट दिसून आली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सर्व (काही अपवाद वगळता!) नेते हे एकाच सुरात बोलत आहेत. पाकला पुढील अनेक वर्षे उठता येणार नाही, अशी अद्दल घडविण्याचा चंग भारताने बांधला आहे. या सर्व प्रकाराचे वर्णन करण्यासाठी समर्थ रामदासांची ‘बहुत लोक मेळवावें। येक विचारे भरावें। कष्टे करोनि घसरावे। म्लेंच्छावरी।’ ही उक्तीच योग्य ठरते.


भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलाने बुधवारी ‘ऑपरेशन सिंदूर’चा शंखनाद केला. ‘ऑपरेशन’ची ही केवळ सुरुवातच. त्याचे कारण म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. देशाचे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी तसे गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देखील स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणार्‍या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) आणि पाकमधील 21 दहशतवादी तळांची यादी बुधवारी दाखवली होती. त्यामुळे आतापर्यंत केवळ नऊ ठिकाणांवरच हल्ला करून ती ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली आहेत. त्याचवेळी हा मजकूर लिहीत असतानाच, दि. 7 ते दि. 8 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने लाहोरमध्येही हल्ला करून पाकची हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ पाकला चांगलेच महागात पडल्याचे आता स्पष्ट व्हावे. त्याचप्रमाणे, पाकद्वारे डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे भारताने आपल्या ‘एस-400’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने निष्प्रभ करून टाकली. त्यामुळे आता पाककडे लाहोरसारख्या अतिशय महत्त्वाच्या स्थानावर हवाई सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे आता पाककडे ‘अल्लाची करुणा’ भाकण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. यातील आणखी एक मेख म्हणजे, पाकची सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा अतिशय सुमार असल्याचेही स्पष्ट झाले. अर्थात, आणखी बरेच काही घडत आहे आणि घडणार आहे. पाकला पुढील अनेक वर्षे उठता येणार नाही, अशी अद्दल घडविण्याचा चंग भारताने बांधला आहे. या सर्व प्रकाराचे वर्णन करण्यासाठी समर्थ रामदासांची ‘बहुत लोक मेळवावें। येक विचारे भरावें। कष्टे करोनि घसरावे। म्लेंच्छावरी।’ ही उक्तीच योग्य ठरते.

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच, भारतातील राजकीय पक्षांनीदेखील या कारवाईविरोधात एकजूट दाखवली. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, सर्व नेते हे एकाच सुरात बोलत आहेत. गुरुवारी सकाळीच झालेली दुसरी सर्वपक्षीय बैठकदेखील अतिशय सकारात्मक वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, विरोधी पक्षातील काही अतित्रासदायक घटकही अगदी कधी नव्हे ते शहाण्या मुलासारखे वागत आहेत. वर म्हटल्याप्रमाणे, त्यात काही महाभागांचे अपवाद आहेतच.

पहलगामच्या हल्ल्यात इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले. त्यामुळे भारतभर असलेला संताप आणि त्याची तीव्रता किती आहे, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. त्यामुळेच ‘स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत’ असा संतापजनक प्रश्न एकाही राजकीय पक्षाने विचारलेला नाही. त्यामुळे राजकीय आघाडीवर देशात निर्माण झालेले हे ऐक्य भारताच्या कारवाईसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. अर्थात, तरीदेखील राजकीय विरोधापुढे राष्ट्रहित महत्त्वाचे न मानणारी पुरोगामी टोळीचे काही फुटकळ कुटिरोद्योगी समाजमाध्यमांवर भारतविरोधी उसासे टाकत आहेतच. त्यांचाही बंदोबस्त सरकार करेल, यात शंका नाहीच.

एकीकडे भारतीय सैन्यदले पाकला बेचिराख करत आहेत, त्याचवेळी भारताविरोधात खोट्या बातम्या पसरविण्याच्या नापाक कुरापती सुरुच आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी सुरू केलेली ही मोहीम अचूक आणि प्रभावी असली, तरी आता त्याचे रुपांतर ऑनलाईन प्रचार युद्धातही झालेले दिसते. पाकसमर्थित सोशल मीडिया अकाऊंट्स आणि काही प्रमुख राजकीय व्यक्तीदेखील जाणूनबुजून बनावट बातम्या पसरवत आहेत, बनावट लष्करी विजयांच्या आणि काल्पनिक सूड उगवण्याच्या कथा रचत आहेत, ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. सत्य लपवण्यासाठी आणि जमिनीवरील वास्तवापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानशी संबंधित राज्य-समर्थित खात्यांनी पुन्हा त्यांच्या जुन्या युक्त्या वापरल्या आहेत. जुन्या प्रतिमांचा पुनर्वापर करणे, दिशाभूल करणारे जुने व्हिडिओ सादर करणे आणि पूर्णपणे बनावट दावे तयार करणे, त्यांचा उद्देश स्पष्ट आहे; जाणूनबुजून अशा प्रकारे खोट्या गोष्टी पसरवणे की, लोकांना सत्य आणि खोटे यात फरक करणे कठीण होईल. ही केवळ चुकीची माहिती नाही; ही एक सुनियोजित आणि समन्वित मोहीम आहे, ज्याचा उद्देश वास्तवाचे विकृतीकरण करणे, जनतेची दिशाभूल करणे आणि संपूर्ण प्रदेशातील विचारसरणीची दिशा बदलणे आहे. मात्र, त्यातही ‘पीआयबी’द्वारे ‘इन्फोर्मेशन वॉर’मध्ये पाकला तडाखे देण्यात येत आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव केवळ एक सैनिकी मिशनचे शीर्षक नव्हते, तर भारतीय परंपरेतील शक्ती, प्रतिकार आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. ‘सिंदूर’ हे केवळ सौंदर्य किंवा पवित्रतेचे नव्हे, तर प्रतिशोधाचे, पराक्रमाचे आणि लढाऊ मानसिकतेचे प्रतीक ठरले. या नावाने शत्रूंना स्पष्ट संदेश दिला, भारतीय सैन्याला भडकवू नका, अन्यथा उत्तर आक्रमक आणि निर्णायक असेल! रक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहता, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सामरिक कारवाई नव्हती, तर भारताच्या बदलत्या लष्करी धोरणाची प्रतिमा होती. ही कारवाई केवळ प्रादेशिक सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हते, तर एक स्पष्ट संदेश होता की, भारत आता फक्त संरक्षणासाठी नाही, तर आघात करण्यासाठीही तयार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, निर्दोष गुप्तचर माहिती आणि अत्यंत प्रशिक्षित जवानांची समन्वयित कारवाई हे या ‘ऑपरेशन’चे प्रमुख घटक होते. हे केवळ क्षेत्रीय आक्रमण नव्हते, तर मनोवैज्ञानिक दडपण टाकणारे पाऊल होते, ज्यामुळे शत्रूंच्या मनोबलाला तडा जाईल.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची बुधवारी झालेली पत्रकार परिषदही महत्त्वाची ठरते. भारताचे परराष्ट्र सचिव विवेक मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ज्या पद्धतीने भारताच्या ऑपरेशनची माहिती दिली, ते मनोवैज्ञानिक युद्धाचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरते. अशा प्रकारच्या माध्यम परिषदा केवळ सामरिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय आत्मविश्वास उंचावण्याच्या दृष्टीनेच महत्त्वपूर्ण नसतात, तर त्या शत्रूंना एक कठोर इशाराही असतात. या परिषदेने भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या धोरणात्मक परिवर्तनाची स्पष्ट जाणीव करून दिली. महिलांचा सहभाग केवळ साहाय्यक नव्हता, तर सामरिक निर्णयांमध्ये भाग घेणार्‍या नेतृत्वकर्त्यांचा होता. हा बदल भारताच्या सामरिक नेतृत्वाची नवी, आक्रमक ओळख घडवणारा आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीचा पाकिस्तान आणि इस्लामी कट्टरपंथी गटांवर खोलवर मानसिक परिणाम होणे अपरिहार्य आहे. महिला अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या या ‘ऑपरेशन’ने त्यांच्यासाठी एक धक्का दिला. पाकिस्तानच्या सैन्याने नेहमीच आपली रणनीती धार्मिक उन्माद आणि कट्टरपंथी विचारसरणीवर आधारलेली आहे. त्यांच्या प्रचारयंत्रणेचा एक मोठा भाग ‘मर्दानगी’वर आधारित आहे, ज्यामध्ये महिलांना दुर्बल समजले जाते. अशा वेळी भारतीय सैन्याच्या दोन महिला अधिकार्‍यांनी ‘ऑपरेशन’ची माहिती जगाला देणे, हे पाकच्या इस्लामी मानसिकतेवर आघात करणारे ठरते. हा एक प्रकारे त्यांच्या सैनिकांचे मनोबल खचवणारा आणि नेतृत्वाची क्षमता कमी करणारा फटका आहे. महिला अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या सामरिक कारवाईमुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेतील ‘मर्दानी वीरता’चा मुखवटा आता उघड झाला आहे, ज्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या नवीन भरती मोहिमांवर होऊ शकतो.