नवी दिल्ली : “माझा देश हा विनाकारण पुरावे नसताना भरडला जात आहे. इथल्या नागरिकांवर बेछुट हल्ले केले जात आहेत. माझ्या देशावर अन्याय होत असेल तर मी बोलणारच. मला माझ्या देशावर अभिमान आहे. पाकिस्तानला विनाकारण पुरावे नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.”, अशी गरळ पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने ओकली आहे.
बॉलीवुडमध्ये रईस या चित्रपटासाठी शाहरुखसोबत सहकलाकार म्हणून भारतात कमाई करणाऱ्या माहीराला दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर पाकिस्तानचा पुळका आलेला आहे. पहलगाममध्ये धर्म विचारुन ठार करण्यात आलेल्या २६ जणांच्या मृतात्म्यांबद्दल एक शब्दही न काढणाऱ्या ढोंगी पाकिस्तानी कलाकारांनी आता सोशल मीडियावर भारताविरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. यात हाफीस सईदचे संपूर्ण कुटूंब ठार झाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका बैठकीत केलेल्या वक्तव्यानासर, किमान शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानच्या एकाही नागरिकाला भारतीय शस्त्रदलांनी इजा पोहोचवलेली नाही. मात्र, याच पाकिस्तनाच्या कलाकारांना दहशतवादाचा पुळका येऊ लागला आहे. एकीकडे भारतात येऊन नाव आणि पैसा कमवायचा आहे. त्याच भारताविरोधात अशी गरळ ओकायची ही पाकिस्तानी कलाकारांची जुनी खोड आहे.
माहिरा खान म्हणते, “भारताचे युद्ध आणि त्यांची तिरस्काराची भावना गेली कित्येक वर्षे कमी झालेली नाही. मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. मात्र, तुमचा आवाज हा नरसंहाराच्यावेळी दाबून टाकला जातो. आम्हाला वाटणारं दडपण तुम्ही तुमचा विजय म्हणून साजरा करता. तुम्ही मध्यरात्री येऊन हल्ला करता आणि त्याला तुमचा विजय म्हणून उल्लेख करता. तुम्हाला शरम वाटली पाहिजे!”, अशी गरळ तिने ओकली आहे. “माझ्या पाकिस्तान देशावर माझे प्रेम आहे. आपण चांगल्या गोष्टी करूयात. आपण कुठल्याही खालच्या पातळीवर घसरणार नाही. शांतता प्रस्थापित होईल, आमीन... पाकिस्तान जिंदाबाद”, असेही ती म्हणाली.
हानीया आमीरलाही दहशतवाद्यांचा पुळका
पहलगाम हल्ला झाला तेव्हा आमच्यापैकी कुणी आनंद व्यक्त केलेला नव्हता. आम्ही त्याचा निषेधच केला होता. पण भारतीय लोक इथल्या लहानग्यांचा जीव गेल्याचा जल्लोष करत आहेत. हिंदूत्वाचा अतिरेक शीगेला पोहोचला आहे. कित्येक कुटूंबांनी आपला जीव गमावला. तुम्ही निष्पापांवर असे बॉम्ब हल्ले करू शकत नाही, असे हानीया आमीर म्हणाली. ती पाकिस्तानी सिरीअल्समध्ये अभिनय करते. तसेच युट्यूबरही आहे.
फवाद खानच्या अबीर-गुलालवर बंदी
नुकताच बंदी आणलेल्या अबीर-गुगला या चित्रपटातील अभिनेता फवाद खानही असेच बरळला आहे. “या शरमनाक हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटूंबियांना या काळात लढण्यासाठी बळ मिळो. अशाप्रकारे बदल्याची भावना घेऊन कसे चालेल. ज्यात निष्पापांचे जीव चाललेत. इनशाह अल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद”, असे फवाद खान म्हणाला.
पाकिस्तानी कलाकारांवर आजन्म बंदी हवी
भारत सरकारने लावलेल्या पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी कायम ठेवायला हवी, असा सूर सोशल मीडिया आणि जनमानसातून उमटत आहे. पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा तीळपापड झाला आहे. कमाई करण्यासाठी त्यांना भारत आणि बॉलीवुड हवे असतात मात्र, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर श्रद्धांजली सोडाच, कारवाईला विरोध करताना भारताविरोधात गरळ ओकण्याचे प्रकार सुरू आहेत.