मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसह रंगभूमीच्या आणि साहित्यविश्वाच्या एका शुद्ध आणि सजग वाटचालीला आज विराम मिळाला आहे. श्यामची आई या अजरामर चित्रपटात श्यामची भूमिका साकारून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, नाट्यदिग्दर्शक आणि प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
१९५३ साली व्ही. शांताराम यांच्या श्यामची आई या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. श्यामची भूमिका साकारताना त्यांनी दाखवलेली समजूतदार अभिनयशैली आजही अनेकांच्या स्मरणात ताजी आहे. त्यांच्या निरागस चेहऱ्याने आणि भावपूर्ण अभिनयाने ते थेट प्रेक्षकांच्या काळजात घर करून गेले. श्यामची आई नंतर त्यांनी काही निवडक चित्रपटांत बालकलाकार म्हणून भूमिका केल्या, परंतु त्यांचे आयुष्य केवळ अभिनयापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी समीक्षक, दिग्दर्शक, लेखक आणि प्राध्यापक म्हणूनही लक्षणीय कार्य केले.
हिंदी आणि मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. बापजन्म, 3 इडियट्स, डिअर जिंदगी, एवढंस आभाळ यांसारख्या चित्रपटांत त्यांची छोटी पण लक्षवेधी भूमिका पाहायला मिळाली. अभिनयापलीकडे गेलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे विचारवंत आणि सुसंस्कृत साहित्यप्रेमी. त्यांनी हॅम्लेट या क्लासिक नाटकाचे दिग्दर्शन करताना त्याला भारतीय रंगभूमीच्या संदर्भात नवे परिमाण दिले.
पुण्याच्या नामवंत वाडिया कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षणक्षेत्रातही त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर प्रभाव टाकला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उदयास आले.
लेखक म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी, नंदनवन अशी त्यांची पुस्तके रसिकांनी उचलून धरली आहेत. त्यांच्या लेखनात अभ्यासू दृष्टिकोन, अनुभवांची शिदोरी आणि चिंतनशीलतेचा ठसा दिसून येतो.
माधव वझे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील एक बहुआयामी झळाळी. त्यांनी रंगभूमीपासून शिक्षण आणि साहित्यापर्यंत प्रत्येक माध्यमात एक आपली खास जागा निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने केवळ एक ज्येष्ठ कलाकार हरपलेला नाही, तर संस्कृतीचा एक सच्चा सेवक आपल्यातून निघून गेला आहे.
त्यांच्या कुटुंबियांप्रती, चाहत्यांप्रती आणि मराठी रंगभूमीप्रती हे फार मोठे नुकसान आहे. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी ठरतील.