_202505071525021164_H@@IGHT_360_W@@IDTH_696.jpg)
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात आम्ही ‘झिरो टोलरन्स’, हेच धोरण अवलंबवले आहे. जगानेही तसेच दाखवावे, अशी पोस्ट एक्सवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केली आहे. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगाने पुढे यावे, या आशयाची एक्स पोस्ट परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांचे हे वक्तव्य 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आले आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय पर्यटक आणि एक नेपाळचा नागरिक ठार झाले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' हे ७ मे रोजी मध्यरात्री १ वाजून ४० मिनीटांनी पार पडले. या कारवाईत एकूण नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तच्या नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली गेलेली नाही, असेही मंत्रालयाने सांगितले. “पाहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. हल्लेखोरांना शिक्षा होईलच, असा आमचा निर्धार आहे,” असे मंत्रालयाच्या विधानात म्हटले आहे.
ऑपरेशन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी सतत संपर्कात होते. पंतप्रधानांनी संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवले आणि या बाबतच्या प्रतिक्रीया ट्विटर वर देताना दिसले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राईकनंतरची भारताची सर्वात मोठी लष्करी कारवाई मानली जात आहे. लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ला करुन भारताने पेहलगाम मधील हल्याचे उत्तर दिले आहे.