नवी दिल्ली : (Pakistan Installed Sirens In 29 Districts Of Khyber Pakhtunkhwa) युद्धाच्या भीतीने भेदरलेल्या पाकिस्तानात नागरिकांना सावध करण्यासाठी भोंगे बसवण्यात आल्याची माहिती आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी मंत्र्यांकडून सातत्याने 'भारत कधीही हल्ला करू शकतो' अश्या आशयाची विधानं केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेपासून (LoC) अनेक किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील २९ जिल्ह्यांमध्ये सायरन प्रणाली बसवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हे वाचलंत का? - "भारताच्या कारवाईला त्वरित प्रत्युत्तर देऊ", पाक लष्करप्रमुखांची पोकळ धमकी
नियंत्रण रेषेपासून दूर असलेल्या २९ जिल्ह्यांमध्ये सायरन प्रणाली
खैबर पख्तूनख्वा सरकारच्या नागरिक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि सिव्हिल डिफेन्स अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत इशाऱ्यांसाठी त्वरित सायरन प्रणाली बसवून त्याचा अहवाल सादर करावा. आदेशानुसार, पेशावर, एबटाबाद, मर्दान, कोहाट, स्वात, डेरा इस्माइल खान आणि बन्नू या मोठ्या शहरांमध्ये प्रत्येकी चार सायरन बसवण्यात येणार आहेत, तर उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक सायरन बसवण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये लोअर दीर, चितराल, कुर्रम, नौशेरा, हरिपूर, बाजौर, हंगू, वझीरिस्तान, ओरकझाई यांसारख्या भागांचा समावेश आहे. हे सर्व जिल्हे नियंत्रण रेषेपासून ३०० ते ५०० किलोमीटर अंतरावर आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे पाकिस्तान फक्त सीमेवरील भागातच नव्हे, तर अंतर्गत प्रांतातही कारवाई होण्याच्या शक्यतेने सतर्क झाला आहे.
पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती
दरम्यान, एकीकडे खैबर पख्तूनख्व्वा भागात नागरिकांना सावध करण्यासाठी भोंगे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला आता लेबनॉन प्रमाणे पेजर हल्ला होण्याची भीती वाटते आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याने पाकच्या नागरिकांना २४ तासातून एकदा आपले फोन बंद करण्याची सूचना दिली आहे. भारत डिजिटल हल्ला करू शकतो, असंही त्याने म्हंटले आहे.