खरी देशभक्ती ही केवळ घोषणांनी किंवा प्रतीकांनी सिद्ध होत नाही, तर ती आपल्या आचार-विचारांतून आणि कृतीतून प्रकट होते.
“देशासाठी काय करता येईल, हा विचार करा; देशाने आपल्यासाठी काय केले आहे, ते नाही.” - जॉन एफ. केनेडी
देशभक्ती म्हणजे काय? देशभक्ती म्हणजे आपल्या देशावर असलेले निस्वार्थ प्रेम. ही एक भावना आहे, जी आपल्याला एकत्र आणते, प्रेरणा देते आणि अधिक चांगले नागरिक बनवते. खरी देशभक्ती म्हणजे केवळ झेंडा फडकावणे किंवा घोषणाबाजी करणे नाही, ती म्हणजे आपल्या हक्कांची जाणीव असणे आणि आपल्या कर्तव्यांची जबाबदारी घेणे. देशभक्त होणे आपल्या मातृभूमीबद्दलची अंतःकरणातून उमटणारी निष्ठा आहे. ही निष्ठा म्हणजे देशाच्या कल्याणासाठी असलेली बांधिलकी, त्याच्या मूल्यांशी एकनिष्ठता आणि त्याच्या उन्नतीसाठी असलेली अखंड तळमळ. देशभक्ती ही दिवाळी, प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्य दिनापुरती मर्यादित नसावी. ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी.
देशभक्ती ही भावना केवळ भावनिक नसून कृतीतून दिसणारी असते. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीत आपण आपला खारीचा वाटा उचलतो, हेच खरे देशप्रेम. देशभक्त नागरिक देशाच्या यशाचा आनंद साजरा करतो, त्याच्या इतिहासाला मान देतो आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करतो.
आपण देशासाठी काय देतो, त्यावरून आपली देशभक्ती ओळखली जाते. आपल्या मातृभूमीबद्दल देशभक्त असणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य मानले जाते, विशेषतः देश संकटात असताना. देशभक्ती अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे आणि जर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना नसेल, तर कोणताही देश यशस्वी होऊ शकत नाही. ज्या देशांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ते देश देशभक्त पुरुषांनी उभे केले होते आणि त्यांच्या देशभक्तीशिवाय अमेरिका किंवा इतर कोणताही देश आज स्वातंत्र्याचा आनंद घेत नसता.
एखाद्या नागरिकाने आपल्या देशाच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील यशाचा अभिमान बाळगणे आवश्यक असते. कारण, त्यातूनच भविष्यात अधिक समृद्धी साधता येते. जशी देशभक्तांची गरज स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होती, तशीच ती आज आहे, जेणेकरून आपण मिळवलेल्या गोष्टी टिकवून ठेवता येतील आणि पुढेही प्रगती करता येईल. खरा देशभक्त नागरिक आपल्या हक्कांचा गैरवापर करत नाही. तो नेहमी आपल्या कर्तव्यांची पूर्तता करतो. तो जाणतो की, नागरिकाचे हक्क आणि कर्तव्य यांमधील समतोल बिघडला, तर संपूर्ण समाजव्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे देशभक्त नागरिक मतदान करतो, कर भरतो, कायद्याचे पालन करतो आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करतो. राजकीय पक्ष विरोधात असू शकतात, तर देशभक्ती अविरोध असते.
देशभक्ती आणि राष्ट्रवाद यातील फरक
देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात मूलभूत फरक आहे. देशभक्ती म्हणजे आपल्या देशावर प्रेम करून त्याची सेवा करणे, तर राष्ट्रवाद अनेकदा ‘आपलाच देश श्रेष्ठ’ ही आक्रस्ताळी भावना निर्माण करतो. राष्ट्रवादाच्या अतिरेकामुळे इतर देशांबद्दल तुच्छता, द्वेष आणि आक्रमक धोरणे जन्माला येतात. त्याउलट, खरी देशभक्ती सर्व नागरिकांना एकत्र आणते आणि जगातील इतर संस्कृतींचाही सन्मान करते. देशभक्ती ही शांतता, समावेशकता आणि जागतिक सौहार्द यांचा पुरस्कार करते.
हे खरे आहे की, प्रसारमाध्यमे भ्रष्टाचार, त्रुटी, अपयश आणि समाजातील विकृती यांचा उघडपणे मागोवा घेतात आणि त्यामुळे नागरिकांना देशातील खरी परिस्थिती समजते. पण, सत्य दाखवण्याच्या या प्रयत्नांत, माध्यमे देशातील बहुतांशी नकारात्मक बाबींनाच प्राधान्य देतात, तर दुसरीकडे देशाची प्रगती, यश आणि सकारात्मक बदल दुर्लक्षित केले जातात. कोणताही देश पूर्णपणे त्रुटींपासून मुक्त असू शकत नाही, पण माध्यमे जर कायमस्वरूपी नकारात्मकतेचेच चित्र दाखवत राहिली, तर आपली युवा पिढी कधीच देशाबद्दल देशभक्तीची भावना मनात बाळगू शकणार नाही.
खरी देशभक्ती ही केवळ घोषणांनी किंवा प्रतीकांनी सिद्ध होत नाही, तर ती आपल्या आचार-विचारांतून आणि कृतीतून प्रकट होते. देशभक्त नागरिक एकमेकांशी आपुलकी, सहकार्य आणि समूहभावनेने वागतात. ते देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करतात आणि त्यामुळे देशात शांतता व सौहार्द नांदते. देशासाठी प्रेम असणारी माणसे शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सेवा, पर्यावरण संवर्धन अशा अनेक क्षेत्रांत आपले योगदान देतात, जे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते.
देशातील त्रुटींवर केवळ टीका न करता, त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणे हे खरे देशभक्ताचे लक्षण आहे. अशा नागरिकांकडून गरिबी, अशिक्षा आणि पर्यावरणविषयक समस्यांवर स्थानिक उपाय सूचवले जातात आणि अमलात आणले जातात. अशा क्रियाशील देशभक्तांमुळेच राष्ट्र इतरांसाठी आदर्श ठरते. आपल्याकडे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांसारख्या व्यक्तींचा आदर्श आहे, ज्यांनी आपल्या कृतीतून देशभक्तीचे सर्वोत्तम उदाहरण घालून दिले.
देशभक्तीमुळे नागरिकांना देशाविषयी एक आत्मीयता आणि आपुलकी वाटते. ‘हा देश माझा आहे आणि मी त्यासाठी काही करू शकतो’ ही भावना त्यांना प्रेरणा देते व आत्मविश्वास प्रदान करते. याशिवाय, खरी देशभक्ती ही लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांचा सन्मान व रक्षण करण्यात दिसून येते. ही मूल्ये आपल्या समाजाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत आणि त्यांचे जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सक्रिय योगदान आवश्यक आहे.
देशभक्त नागरिक मतदानात भाग घेतात, कायद्याचे पालन करतात, इतर नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करतात आणि आपली संस्कृती जपत देशाच्या एकात्मतेस बळकटी देतात. हे कार्य केवळ सरकारचे नसून प्रत्येक सुजाण नागरिकाचेही असते. त्यामुळे देशभक्ती म्हणजे केवळ भावना नव्हे, तर ती एक जीवनशैली आहे, ज्यामध्ये जबाबदारी, सहभाग, सन्मान आणि सेवा या मूल्यांचा समावेश असतो.
जर आपल्या देशात देशभक्त नागरिक उरले नाहीत आणि आपण आपल्या मुलांनाही देशप्रेम शिकवले नाही, तर मग उद्या आपल्या देशासाठी आणि आपल्या मूल्यांसाठी लढा कोण देणार? असा प्रश्न उपस्थित व्हायला फार वेळ लागणार नाही.
डॉ. शुभांगी पारकर