पालघर : कुपोषित तालुका, अशी नकोशी ओळख बनलेल्या जव्हार तालुक्यातील तरुणाने केलेल्या कामगिरीचे आता देशभर कौतूक होऊ लागले आहे. कोगदेसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या डॉ. अजय काशिनाथ डोके यांनी पालघर जिल्ह्याची ओळख बदलण्याचा निर्धार घेतला होता. डॉ. अजय डोकेंनी २०२४च्या युपीएसई परीक्षेत ३६४वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही क्लासची मदत न घेता, फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर हे यश प्राप्त केले. वीज, इंटरनेट किंवा अन्य कुठल्याही प्रकारची सोय नसतानाही अडचणींवर मात करत अजयने आपले हे स्वप्न पूर्ण केले आहे. बालपणापासून शिक्षणात रमणाऱ्या डॉ.अजय यांची परिस्थिती बेताची असली तरही त्यांनी हार मानली नाही.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते डॉक्टर झाले. पण ह्यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. समाजात बदल घडवायचा, आपल्या लोकांसाठी काही करायचं हेच ध्येय ठेऊन त्यांनी युपीएसईच्या अभ्यासाला सुरवात केली. मोबाईलवर ऑनलाईन नोट्स वाचत, विविध उपयोगी व्हिडिओ पहात त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे.