देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या! मंत्री आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

15 May 2025 12:45:40
 
Aditya Thackeray & Ashish Shelar
 
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या सुरु आहे, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंसह उबाठा गटावर केला आहे. तसेच त्यांनी मुंबकरांना सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.
 
 
 
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी २ हजार ३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आणि कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरुन या देवनार क्षेपणभूमीवर घिरट्या घालू लागले आहे. हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पाकिस्तानला पाठींबा देणं तुर्कीला महागात! भारतीयांनी 'असा' दिला दणका
 
ते पुढे म्हणाले की, "सन २००८ साली आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्याची किंमत ४ हजार ५०० कोटी होती. आतापर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. आम्ही त्यावेळी या कंत्राटाला विरोध केला होता. या कंत्राटामध्ये अनेक उणिवा आहेत हे आम्ही दाखवले होते. हा निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी मुंबईकरांसमोर उघड केली होती. पण आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४ हजार ५०० कोटी रुपयांची देवनार डम्पिंग ग्राउंडची निविदा मंजूर केली. कटकमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही."
 
४ हजार ५०० कोटींचा हिशेब कोण देणार?
 
"कचऱ्याचे ढिगारे देवनारमध्ये आजही कायम आहेत. दुर्गंधीने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. दमा, फुफ्फुसाच्या आजारांनी मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत. देवनार डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करा अन्यथा एक वर्ष मुंबईतील नव्या बांधकामावर बंदी आणा असे सांगून न्यायालयाने झोडपून काढेपर्यंत सत्ताधारी म्हणून उबाठाने काहीच केले नाही. ४ हजार ५०० कोटीचे कंत्राट दिले त्याचा हिशेब कोण देणार? आता हेच पालिका कचरा उचलण्याची निविदा काढली तरी ओरडणार," अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का?
 
मुंबईकर हो समजून घ्या, ज्यांनी ज्या कामासाठी ४ हजार ५०० कोटीची निविदा दिली, मलाई खाल्ली आणि पळ काढला तेच आता २ हजार ३६८ कोटी कशाला खर्च करताय? म्हणून ओरडत आहेत. मग त्यांनी देऊ केलेले ४ हजार ५०० कोटी मोठे की, आजचे २ हजार ३६८ कोटी? ज्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंचही जागा अदानीच्या नावावर होणार नाही. धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल. अपात्र झोपडपट्टी वासीयांनाही घर मिळणार. मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का?" असा सवालही मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0