नवी दिल्ली : (PM Narendra Modi at Adampur Air Base) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त करुन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन थेट हवाई दलाच्या जवानांसोबत संवाद साधला.
'ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी वायुदलाच्या जवानांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट दिली. भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून आदमपूर हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. परंतु भारताचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, आपले सर्व लष्करी तळ आणि आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत. यावरून कोणत्याही एअरबेसला कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, हे स्पष्ट झालं. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर या खोट्या दाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
आदमपूर हवाई तळ (पंजाब) हा भारतीय हवाई दलाच्या मिग-२९ चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वांत मोठ्या लष्करी हवाई तळांपैकी आदमपूर हे दुसरे सर्वात मोठे हवाई तळ आहे. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात आदमपूर हवाई तळाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\