नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील २५ वर्षीय जवान मुरली नाईक हुतात्मा झाले. आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्ली थांडा गावचे होते. नाईक यांचे आई वडील घाटकोपर येथे स्थायिक होते. मुरली यांनी २०२२ मध्ये भारतीय लष्करात भरती होऊन ८५१ लाइट रेजिमेंटमध्ये सेवा सुरू केली होती.
८ मे रोजी पहाटे ३ वाजता पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात नाईक जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या दु:खद घटनेची माहिती मिळताच त्यांच्या आईला रडू आवरले नाही. मुरली नाईक हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवते होते. वडीलांनी दिलेल्या एका स्थानिक चॅनलच्या मुलाखतीमध्ये त्यांची व्यथा व्यक्त केली, आता सगळे सरकारवर सोडून दिले आहे, आम्ही पोरके झालो.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नाईक यांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण केली . राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला ₹५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे