मुंबई : भुलेश्वर परिसरातील १५० वर्षे जुन्या माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराला आज महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन जी आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा जी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान मंदिरातील धार्मिक विधींमध्ये सहभागी होत त्यांनी दर्शन घेतले.
यावेळी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासोबतच भारत-पाकिस्तान संघर्षात सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांचे मनोबल वाढावे, त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळावे यासाठी विशेष प्रार्थना आणि पूजा करण्यात आली.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “भारताचं सैन्य हे जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक आहे. त्यांची तांत्रिक क्षमता, मानसिक ताकद आणि देशभक्ती अद्वितीय आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
मंदिराला १५० वर्ष पूर्ण झाल्या प्रसंगी मंदिरात भगवान महादेवाचे, हनुमंताचे आणि गोमातेचे पूजन करण्यात आले. सर्वांनी शहिदांच्या आत्म्याला शांती लाभो आणि सैन्याचे मनोबल सदैव कणखर राहो, अशी प्रार्थना केली.