मुंबई : स्वारगेट अत्याचार घटनेबाबत मंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर सगळीकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अशा घटनांमध्ये संवेदनशीलपणे बोलण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले असे मला वाटते. हा गर्दीचा परिसर आहे, बस बाहेर होती पण यात प्रतिकार होताना लोकांना लक्षात आले नाही, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते नवीन असून काहीतरी करण्याचा प्रयत्न करताहेत. परंतू, अशा प्रकरणात बोलताना थोडे अधिक संवेदनशील बोलले पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाल्यास समाजमनावर त्याचा वेगळा परिणाम होतो. त्यामुळे सगळ्याच मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी अशा घटनांवर संवेदनशीलपणे बोलले पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला.
हे वाचलंत का? - स्वारगेट घटनेचा लवकरच पर्दाफाश होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा!
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "उद्धव ठाकरे रोजच काही गोष्टी बोलत असतात. त्यांना रोजच उत्तर देण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ नाही. उद्धव ठाकरे जर खरे होते आणि हे गद्दार होते तर महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना मत दिले का? हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना निवडून देऊन ज्यांच्यावर शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले त्यांना ते गद्दार म्हणत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आरसा बघितला पाहिजे," असेही ते म्हणाले.