मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Karachi temple Pujari) पाकिस्तानी लष्कराने देशातील अतिरेकी संघटनांविरोधात हिंदूंना नेहमीच पाठिंबा दिला असल्याचे मत कराचीतील सर्वात मोठ्या हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी राम नाथ मिश्रा यांनी व्यक्त केलंय. राम नाथ मिश्रा सध्या अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी केलेल्या विधानाची सध्या चर्चा होते आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानात मंदिरांवर होणारे अतिक्रमण, कट्टरंपथी संघटनांविरोधातील लढा तसेच भारत-पाकिस्तान संबंधाबाबत भाष्य केले.
हे वाचलंत का? : हजारो कैदींना पापमुक्त होण्याची सुवर्ण संधी; यूपी पोलिसांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?
पंचमुखी हनुमान मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरोधातील संघर्षाच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, 'फाळणीच्या वेळी मूळ २५ हजार चौरस फुटांवर पसरलेल्या या मंदिराच्या बहुतांश जमिनीवर अतिक्रमण झाले होते, परंतु २०१८ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे हे अतिक्रमण हटवण्यात आले. पंचमुखी हनुमान मंदिराच्या जमिनीसाठी दीर्घकाळ लढा दिला. अनेक कट्टरपंथी संघटनांनी आमचा विरोध केला पण आम्ही पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि फाळणीपूर्वी आमच्याकडे असलेली सर्व जमीन परत करण्याची मागणी केली.'
पुढे ते म्हणाले, 'पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व हिंदू मंदिरांसाठी निर्णय दिला, त्यात न्यायालयाने अल्पसंख्याक समुदायाची सर्व प्रार्थनास्थळे आणि मालमत्ता मोकळी करून अल्पसंख्याकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमिवर आम्ही पाकिस्तान सरकारला मंदिर एक भव्य वास्तू म्हणून विकसित करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून जगभरातील पर्यटक आकर्षित होतील आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल."