मुंबई : (Devendra Fadnavis) सातारा ड्रग्स प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबियांचा कोणताही संबंध नसून, शिंदेंवर लावले जात असलेले आरोप हे पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. जाणीवपूर्वक दिशाभूल करून शिंदेंचे नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून ते केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहेत. “या प्रकरणात शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही सहभाग नाही. केवळ राजकीय बदनामीसाठी त्यांचे नाव ओढले जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. “या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करून मोठी कारवाई केल्याबद्दल मी पोलिस विभागाचे अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले.
हेही वाचा : गोवा मुक्तिसंग्राम : राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय
सुषमा आंधारे काय म्हणाल्या?
साताऱ्यातील सावरी गावातील एका शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ४५ किलो ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. या ड्रग्जची अंदाजे बाजारपेठेतील किंमत सुमारे १४५ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईनंतर सुषमा आंधारे यांनी खळबळजनक आरोप करत म्हटले होते की, संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या तिघांना एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील ‘हॉटेल तेज यश’ येथून जेवण जात होते. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून त्यांनी २०१७ साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. तसेच, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काही माहिती दडपल्याचा आरोप करत, ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित तीन जणांची नावे एफआयआरमध्ये नाहीत, असा दावाही आंधारे यांनी केला होता.
हे वाचलात का ?: हिंदुत्व विचारात, हिंदुत्व कृतीत!
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, सत्य समोर आणण्याचे काम पोलिसांनी केले असून राजकीय आरोपांवर जनता विश्वास ठेवणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.