मुंबई : ( Bharatiya Janata Party ) भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेत मंगळवार दि .१४ रोजी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या हस्ते टॅक्सीचालक, ओला उबेर, रेपिडो चालक यांसह विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना अमित साटम म्हणाले की,"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास यात्रेत मी तुमचे स्वागत करतो. मुंबई डबेवाले, गिरणी कामगार ही जशी मुंबई ची ओळख होती तसेच मुंबईची काळी पिवळी टॅक्सी ही देखील जगभरात ओळखली जाते. विमानतळ क्षेत्रात तुम्हाला कॅन्टीन, औषधोपचार या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून. मुंबईत आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा आमचा उद्देश आहे.मुंबई टॅक्सी ची खासियत जगात ओळखली जाते, ती म्हणजे प्रामाणिकपणा ,रात्री दोन वाजता एखादी महिला टॅक्सीत बसायला घाबरत नाही हा तुमचा प्रामाणिकपणा आहे." "सध्याचे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी फक्त भाषिक वादावर बोलतात पण गेली २५ वर्षे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काय काम केले यावर काही बोलत नाहीत. भ्रष्टाचारावर बोलत नाहीत." अशी टीका साटम यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी उ. बा. ठा. गटावर केली.
सुधाकर देशमुख म्हणाले की "राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना माध्यमातून टॅक्सी चालक ,माथाडी कामगार ,हॉटेल कर्मचारी यांच्यासोबत ही संघटना काम करते.खूप वर्षापासून टॅक्सी चालकांचे विषय प्रलंबित होते, कामगार हीत कोण लक्षात घेत न्हवते. पण आता भारतीय जनता पक्षात आल्याने सर्व प्रश्न मार्गी लागतील. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वजण भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवूया."
सिद्धिविनायक ट्रस्ट कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी म्हणाले की,"राष्ट्रप्रथम मानणाऱ्या पक्षाशी आम्ही जोडलो गेलो याचा अभिमान आहे.मुंबई मध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांची सुरक्षा महत्वाची होती,२०१४ नंतर केंद्रात नरेंद्र मोदींच्या रूपाने मजबूत सरकार आले आणि मुंबई मधील सामान्य माणसाला सुरक्षित वाटू लागले."
बलवीर नेगी यांनी अमित साटम यांचा सत्कार केला. यावेळी विविध पदांच्या नियुक्तीचे पत्र आमदार अमित साटम यांच्या हस्ते दिले गेले. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम,राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटन राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर देशमुख,राहुल गजानन वाळंज(चेंबूर), पवन त्रिपाठी , कन्हैया सिंह (गुड्डू), इर्शाद अली, शिवकुमार दुबे (फायटर), मनोज मिश्रा, रिझवान, सुनील मिश्रा, अस्लम खान, डॉ. महेश पोरे, संजय पवार, अभिषेक राऊत, दीपक कांदळगावकर, जब्बार युनूस शाह, अब्दुल कलाम खान, अमोल देसाई , राम पवार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी काळी पिवळी,कूल कॅब टॅक्सी चालकांचे अनेक वर्षांपासून रखडलेले अनेक विषय,समस्या मार्गी लावल्याबाबत चालकाच्या वतीने अमीत साटम व सुधाकर देशमुख व बलबीर नेगी यांचा सत्कार करण्यात आला, व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.