मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुरुवार, १६ जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांनी आपल्याला सगळी माहिती दिली आहे. या हल्ल्यामागे कोणता हेतू असू शकतो आणि ते कुठून आले? हेसुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावर पूर्ण कारवाई सुरु आहे."
हे वाचलंत का? - आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील एक काळी रात्र!
मुंबई सर्वात सुरक्षित शहर!
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. कधी कधी काही घटना घडतात, हे खरं आहे. त्यांना गंभीरतेनेदेखील घेतले पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिले पाहिजे यादृष्टीने सरकार निश्चित प्रयत्न करेल."