मुंबई : दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकाच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल, असा पलटवार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शरद पवारांवर केला आहे.
शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. यावर आता विनोद तावडे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती. दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार साहेब विसरले आहेत," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीये! भास्कर जाधवांचा पक्षाला घरचा आहेर
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतही हेच बोलणार का?
विनोद तावडे पुढे म्हणाले की, "दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले. त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे," असा सवालही त्यांनी पवारांना केला आहे.