मुंबई : अभ्यास न करता बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली आहे. तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी मिळून राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबद्दल संजय राऊत म्हणाले की, "तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. केंद्रात किंवा राज्यात जे सत्तेत असतात त्यांचे काही अडचणीचे विषय असतात. मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! संजय राऊतांचं हेच काम!
यावर बच्चू कडू म्हणाले की, "संजय राऊतांना नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. ज्यावेळी देशात काँग्रेस आणि भाजप लढत होती त्यावेळी शिवसेना तिसरीच होती. मग तेव्हा ती पैशांसाठी लढत होती का? समजा महाराष्ट्रात यांची सत्ता असेल आणि मग उद्या मी लढलो तर पैशांसाठी लढलो असा अर्थ होईल का? मी चारवेळा निवडून आलोय. संजय राऊतांना निवडून कसं येतात ते माहिती नाही. अभ्यास न करता एखाद्या बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही," असे ते म्हणाले.