मुंबई : राज्यभरात सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असताना सर्वांना निवडणूकांच्या तारखांची उत्सुकता लागली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूकीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूका होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी विधानसभा निवडणूक आणि महायूतीच्या जागावाटपाबाबत भाष्य केलं. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूका होऊ शकतात आणि दोन टप्प्यात या निवडणूका होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे वाचलंत का? - मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सर्वात चांगला : अजित पवार
जागावाटपाबाबत काय म्हणाले?
लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त होता, त्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तसेच जिंकून येण्याची क्षमता हासुद्धा जागावाटपाचा निकष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीत शिवसेनेने १५ जागा लढवल्या आणि ७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने २८ पैकी ९ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४ पैकी १ जागा जिंकली होती.