सांगली : विधानसभा निवडणूकांना काहीच दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा (मविआ) सांगली जिल्ह्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. ३-३-२ असा हा फॉर्म्युला असल्याची माहिती पुढे आली आहे.
विधानसभा निवडणूका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीने निवडणूकांसाठी कंबर कसलीये. दरम्यान, सांगली जिल्ह्यासाठी मविआचे जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. सांगलीतील ८ जागांपैकी काँग्रेस ३, शरद पवार गट ३ जागा आणि उबाठा गट २ जागा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - राज ठाकरेंची 'ती' पळवाट होती! जरांगेंची टीका
लोकसभा निवडणूकीच्या वेळी सांगली मतदारसंघ चांगलाच गाजला होता. याठिकाणी काँग्रेस आणि उबाठा या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. त्यानंतर उबाठाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत याठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. दरम्यान, विधानसभेतही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आधीच जागावाटपाचे सूत्र निश्चित केल्याचे बोलले जात आहे.