नवी मुंबई : उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख हा यशश्री शिंदेकडे लग्नाची मागणी करत होता. तसेच लग्न न केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी ही माहिती दिली आहे.
याबद्दल बोलताना अमित काळे म्हणाले की, "दाऊद आणि यशश्री हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यांचा परिचय होता आणि यातूनच तो तिच्या मागे लागला होता. त्यातच २०१९ मध्ये त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हातून तुरुंगातून सुटल्यानंतर कोरोनाकाळात तो आपल्या गावी परत गेला होता. मध्यंतरी तो मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता. भेटायला आली नाही तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा."
हे वाचलंत का? - ...तर उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील : चंद्रशेखर बावनकुळे
"२३ तारखेला दाऊद शेख कर्नाटकमधून इथे परत आला. २४ तारखेला तो यशश्रीला भेटला आणि तिला परत भेटण्याची मागणी करत होता. पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर २५ तारखेला त्याने तिला परत बोलवलं. ती भेटायला गेल्यावर तु माझ्यासोबत का राहत नाही, यावरून त्यांच्यात भांडण झालं. तो आधीच स्वत:सोबत चाकू घेऊन आला होता. त्याने तिच्यावर वार केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तिथून कर्नाटककडे निघून गेला," असे त्यांनी सांगितले.
तसेच दाऊद शेख यशश्रीला लग्नासाठी तगादा लावत होता. तसेच तिला कर्नाटकला सोबत येण्याचीही मागणी करत होता. परंतू, ती त्याला प्रतिसाद दिला नाही. एवढंच नाही तर मृत्यूपूर्वी यशश्रीने तिच्या एका मित्राला फोन केला होता. "मी अडचणीत आहे. मला सोडव," अशी विनंती ती त्याला करत होती. परंतू, तो नेटवर्कमध्ये नसल्याने त्यांच्यात व्यवस्थित बोलणं झालं नाही," अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.