नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात बंगळुरु येथील विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. दरम्यान, कर्नाटक भाजपने दाखल केलेल्या मानहानी खटल्याप्रकरणात सुनावणीदरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर राहिल्याचे पाहायला मिळाले. मानहानी प्रकरणात विशेष न्यायालयाने जामीन मंजूर करतानाच पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निडवणुकीआधी बदनामी करणारी जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे. सदर जाहिरातीत तत्कालीन भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असा आरोप केला होता. या आरोपांच्या विरोधात भाजपने राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.
कर्नाटक भाजपकडून मुख्यमंत्री सिध्दरामय्या व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून दोघांना समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणात आता राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.