पुणे : लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा पाहायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही जात नाहीत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हेंवर केला आहे. सोमवारी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आढळराव पाटील यांनी पक्ष बदलला नाही. जागावाटपात शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पण मी त्यावेळी म्हटलं की, जागा जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली तरी उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांनाच देऊ. त्यामुळे त्यांनी पक्ष बदललेला नाही. आम्ही तिघेही एका विचाराने सोबत आलो आहोत."
हे वाचलंत का? - "धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबद्दल दाखवलेलं सगळं खोटं!"
"मागच्या वेळी पालघरमध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला जागा आणि उमेदवार दोन्ही द्या असं म्हटलं. आमच्या खासदाराला आम्ही उद्धव ठाकरेंना दिलं आणि पुन्हा तिथून निवडून आणलं. त्यामुळे एका विचारात काम करत असताना पक्ष बदलला असं काहीच नसतं. समोरच्या उमेदवाराने किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या ५ वर्षात कितीवेळा फेसबूक पोस्ट टाकल्या हे त्यांना विचारावं. ते कुठे कुठे जाणार होते आणि कसे थांबले याबद्दलचं सत्य आम्ही सांगितलं तर त्यांचा चेहरा उघड होईल. पण आढळरावांपेक्षा ते एका गोष्टीत सरस आहेत. आढळराव नाटककार नाहीत. ते खूप नाटकी आहेत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं आणि चुगलेबाजीही करता येते. पण एक लक्षात ठेवा की, लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही नाटक पाहायला जात नाहीत," असा खोचक टोला त्यांनी लगावला.