लोकसभेसाठी मतदान अंतिम टप्प्यात, एक्झिट पोल वर्तवणार विजयाचा अंदाज
31 May 2024 20:05:58
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान आज होणार असून त्यानंतर सायंकाळपासून मतदानोत्तर कल चाचण्याचे (एक्झिट पोल) निकाल विजयाचा अंदाज वर्तवणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार असून त्यासाठीच्या प्रचारतोफा गुरुवारी थंडावल्या आहेत. अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यासाठी ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. सातव्या टप्प्यात पंजाबमधील १३, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६, हिमाचल प्रदेशातील ४, झारखंडमधील ३ आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगढमधील एका जागेवर मतदान होणार आहे.
अखेरच्या टप्प्यात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आर. के. सिंह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे, केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अनुप्रिया पटेल यांचेही भवितव्य ठरणार आहे. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, उपेंद्र कुशवाह, सिनेअभिनेत्री कंगना रनौत याही विशेष लढती आहेत.
एक्झिट पोलकडे देशाचे लक्ष
आजच्या मतदानाबरोबरच देशातील सार्वत्रिक निवडणुका संपणार आहेत. ४४ दिवसांच्या या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार असली तरी मतमोजणीपूर्वीच एक्झिट पोलद्वारे अंदाज वर्तवण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीच्या मध्यावर एक्झिट पोलला परवानगी नाही. मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर ३० मिनिटांनी एक्झिट पोल जाहीर केले जातील.