अहमदनगर : धनगर आरक्षणासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन लढा देणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "धनगर समाजाचा हा संघर्षाचा काळ आहे. तुम्ही आमची सगळी कामं केली पण आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात आमच्या विरोधात निकाल गेला. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यावर काहीतरी मार्ग काढतील हा आम्हा सर्वांना विश्वास आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - ठाकरेंच्या अडचणी वाढणार! 'त्या' पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाकडून दखल
ते पुढे म्हणाले की, धनगर आरक्षणासाठी मी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करणार आहे. सरकार म्हणून तुम्ही आमच्यासोबत ठामपणे उभं राहावं, अशी विनंती त्यांनी केली. तसेच यामध्ये कुणीही राजकारण करु नये. राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं मी अनेकदा पाहिलेलं आहे, असेही त्यांनी सांगितले.