"आम्हाला पाकिस्तानपासून वेगळं होण्यासाठी मदत करा"; बलुचिस्तानच्या नेत्याचे भारताला आवाहन
14-May-2024
Total Views |
इस्लामाबाद : पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य करण्यासाठी लढा देण्याऱ्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) या संघटनेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताचा पाठिंबा मागितला आहे. इराणमध्ये आश्रय घेतलेला बीएलएफ नेता अल्लाह नजर बलोच म्हणाला की, "आम्ही इराण, अफगाणिस्तान, भारत, सौदी अरेबिया यांना पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. बलुचिस्तानमधील जनता प्रदीर्घ काळापासून पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराला त्रस्त आहे. पाकिस्तानी सैन्याने हजारो बलुचांचे अपहरण करून त्यांची हत्या केली आहे." असा आरोप अल्लाह नजर बलोच यांने पाकिस्तानच्या लष्करावर लावला.
स्वातंत्र्य समर्थक नेते आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) प्रमुख अल्लाह नजर बलोच यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बलुच राष्ट्र इराण, अफगाणिस्तान, भारत आणि मध्यपूर्वेतील सर्व देशांसह शेजारील देशांना आमच्या आत्मनिर्णयाच्या लढ्यासोबत उभे राहण्याचे आवाहन करते. आम्ही युरोपियन युनियन, अमेरिका, संयुक्त राष्टसंघ आणि मानवाधिकार संघटनांसह आंतरराष्ट्रीय समुदायाला देखील पाकिस्तानी राज्याकडून बलुच लोकांविरुद्ध होत असलेल्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना बलोच म्हणाले की, "हजारो वर्षांपासून, बलुच लोकांनी एक वेगळी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख राखली आहे. अरब जगाशी आमचे दीर्घ आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. तथापि, १९४७ मध्ये स्थापन झालेल्या पाकिस्तानने बलुचिस्तानवर ७६ वर्षांपासून कब्जा केला आहे आणि आमच्या लोकांवर पद्धतशीर अत्याचार आणि हिंसाचार करत आहे."