नागपूर : वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते हे सांगण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र हे देशाच्या वाढीचं इंजिन आहे. या देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. भविष्यातदेखील सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करत महाराष्ट्र पुढेच जात राहील, असा मला विश्वास आहे."
हे वाचलंत का? - २८-१५-४-१! महायूतीचा फॉर्म्यूला निश्चित
"निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मागच्यावेळीपेक्षा यावेळी मतदान कमी आहे असं वाटत नाही. परंतू, यापेक्षाही जास्त मतदान व्हायला हवं. मतदान हा आपला अधिकार आहे. खरंतर लोकशाहीमध्ये त्यांनाच आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे जे मतदान करतात. त्यामुळे आपलं मत मांडायचं असेल तर मतदान केलं पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "एखादा व्यक्ती रोज बडबड करेल तर त्याला उत्तर देता येत नाही. वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते हे सांगायची गरज नाही," असा टोला त्यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.