भारतीय कामगारांची पहिली तुकडी इस्त्रायलला रवाना?, इस्त्रायली राजदूतांची पोस्ट चर्चेत!
03 Apr 2024 14:40:48
नवी दिल्ली : इस्त्रायल-हमास युध्दानंतर भारतीय कामगारांची पहिली तुकडी इस्त्रायलला पाठविण्यात आली आहे. भारत-इस्त्रायल या उभय देशांमधील राजनैतिक करारानुसार भारतीय बांधकाम कामगारांची एकूण ६० जणांची पहिली तुकडी रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून दोन्ही देशांमध्ये G2G करारावर काम करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्त्रायल सरकार आता पॅलेस्टिनी कामगारांच्या जागी एक लाख भारतीय कामगारांना कामावर ठेवू इच्छित आहे. याची सुरुवात झाली असून ६० भारतीय कामगारांची पहिली तुकडी इस्रायलला रवाना झाली आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनींचे परमिट रद्द करण्यात आले आहे.
इस्त्रायलकडून भारताकडे १ लाख कामगारांची तुकडी मागितली होती. परंतु, आता भारताकडून पहिल्या तुकडीत ६० हून अधिक कामगारांना इस्त्रायलला रवाना करण्यात आले आहे. प्रत्यक्षात, इस्रायलने भारत आणि इतर देशांमधून हजारो कामगारांची भरती करण्याची घोषणा केली होती. पॅलेस्टिनी कामगारांच्या जागी या कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचे कारण, हमासबरोबरच्या संघर्षानंतर इस्रायलने ऑक्टोबर २०२३ मध्ये पॅलेस्टिनी कामगारांचे वर्क परमिट रद्द करण्यात आले होेते.
मागील वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत इस्त्रायलमध्ये कामगारांना बोलावण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचे आवाहन केले होते. मात्र, इस्रायलच्या राजदूतांच्या वक्तव्यानंतर परदेशात रोजगारावर लक्ष ठेवणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयासह भारताकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.