आता भारतीय कंपन्यांमध्ये भारतीय मुख्याधिकारी!

    26-Apr-2024
Total Views |
Indian Corporate company


भारतात असणारी कंपनी परकीय असो किंवा भारतीय असो, पूर्वी त्यांच्यातील मुख्याधिकारी परदेशी नागरिक असण्याकडे कल होता. पण आता काळ बदलला आहे. आता परदेशी किंवा भारतीय कंपन्यांमध्ये मुख्य अधिकारी भारतीय असतात. हा बदल का झाला? त्याची गरज का भासली याबद्दल यालेखात जाणून घेऊया...
 
सुमारे २५ वर्षांपर्यंत भारतातील आणि भारतीय कंपन्यांमध्ये कंपनीचे व्यवस्थापनप्रमुख म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक अथवा मुख्य कार्यपालन अधिकारी पदावर, विदेशी व्यक्ती वा विषयतज्ज्ञांची नेमणूक करण्यावर सर्वांना भर असायचा. त्यावेळी भारतातील विदेशी अथवा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवस्थापनपद्धती व शैलीचा तो अपरिहार्य परिणाम होता. परिणामी, कंपनी जरी भारतात असली, तरी मुख्याधिकारी मात्र युरोपियन अथवा पाश्चात्य देशातीलच असायचे. या प्रस्थापित व्यवस्थापनपद्धती व परंपरेला छेद देण्याचे काम, गेल्या सुमारे २० वर्षांत सुरू झाले. गेल्या दशकात त्याने वेग घेतला व आज भारतातील प्रमुख आणि मोठ्या कंपन्यांमध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी भारतीय मुख्याधिकारी दिसून येण्याचे सुखद चित्र साकारले गेले आहे.
 
भारतातील प्रस्थापित व मोठ्या स्वरूपातील उद्योगव्यवसायांची शीर्षस्थ संस्था असणार्‍या, निफ्टीमध्ये समाविष्ट निर्देशप्रमुख ५० कंपन्यांमध्ये कधी अधिकार्‍यांसह मुख्याधिकारीही विदेशी असत. मात्र, यासंदर्भात निफ्टीद्वारेच प्रकाशित तपशीलानुसार आता, थिरी डेलॉपोरेट हे व्रिप्रोच्या मुख्याधिकारी पदावरून मुक्त झाल्यानंतर, या श्रेणीतील केवळ निवडक कंपन्यांची व्यवस्थापनसूत्र सांभाळणार्‍या व्यक्ती विदेशी असणार आहेत.

भारतातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या सर्वोच्चपदी सध्या कार्यरत असणार्‍या निफ्टीशी संबंधित कंपन्यांमध्ये आता मारूती सुझुकी, डॉ.रेड्डी लेबॉरेटरीज व कोटक महिंद्र बँक या कंपन्याचाच समावेश आहे. इतर भारतीय कंपन्यांच्या मुख्याधिकारी पदांवर काम करणार्‍या कंपन्यांच्या तुलनेत, अद्यापही निफ्टी अंतर्गत कंपन्यांच्या मुख्याधिकार्‍यांचे प्रमाण तुलनेने अधिक ठरते. यासंदर्भात अधिक पडताळा घेता प्राईम डेटाबेसच्या तपशीलानुसार २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाअखेरी, भारतातील शेअर बाजारात सार्वजनिक कंपनी म्हणून पंजीकृत अशा एकूण २ हजार, ५२१ कंपन्यांध्ये, मुख्याधिकारी अथवा व्यवस्थापनप्रमुख म्हणून आजही विदेशी व्यक्ती कार्यरत आहेत. विदेशी व्यक्ती मुख्याधिकारी म्हणून काम करणार्‍या, सार्वजनिक मर्यादित स्वरूपात नोंदणी झालेल्या कंपन्यांची संख्या २ हजार, ४८ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय कंपन्यांमध्ये विदेशी व्यक्ती मुख्याधिकारीपदी असण्याच्या संदर्भात, शेअरबाजारात नोंदीकृत मोठ्या कंपन्यांच्या संदर्भात उपलब्ध माहिती खालीलप्रमाणे आहे. गेल्या दशकातील वरील तपशील व आकडेवारीवरून स्पष्ट होणारी बाब म्हणजे, शेअर बाजारात नोंदणी झालेल्या भारतीय कंपन्यांच्या संस्थेत लक्षणीय स्वरूपात वाढ होत होती. मात्र, यावेळी या कंपन्यांच्या मुख्याधिकारीपदावर नेमणूक होणार्‍या विदेशी तज्ज्ञ व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली नाहीच, उलट त्यामध्ये काही प्रमाणात घट मात्र निश्चित स्वरूपात झाली आहे.

भारत आणि भारतीय कंपन्या यांसंदर्भात परंपरागतरित्या सांगायचे म्हणजे, भारतीय कंपन्या आणि व्यवस्थापनांचा मुख्य भर हा कंपनीच्या सर्वोच्चपदी भारतीय व्यक्ती-व्यवस्थापकाची नेमणूक करण्यावरच असतो. यामागे, ‘आपला माणूस’ ही भावना प्रत्यक्ष स्वरूपात तर असतेच, याशिवाय भारतीय भाषा, संस्कृती, कार्यपद्धती, व्यक्तिगत व्यवहार, मनोभावना, नेतृत्वातील लवचिकता इ. बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

याच्याच जोडीला मूलतः भारतीय व आता जागतिक स्तरावर उद्योग-व्यवसायाची व्याप्ती वाढविलेल्या प्रमुख व प्रगतीशील कंपन्यांनी, प्रसंगी वेगळी वाट चोखाळल्याचे दिसते. यासंदर्भात प्रामुख्याने व उदाहरणादाखल म्हणून प्रसंगी व गरजेनुरूप भारतीय कंपनीत विदेशी व्यक्तीची व्यवस्थापनप्रमुख पदावर नेमणूक करणार्‍या कंपन्या म्हणून, एअर इंडिया, इंडिगो, डीआरआय, नायकॉन ग्रुप, सिंजेन इंटरनॅशनल यासारख्या कंपन्याचा उल्लेख करता येईल. सनफार्माने इस्त्रायलच्या तेव फार्मा कंपनीच्या मुख्याधिकार्‍यांना आपले व्यवसाय प्रमुख म्हणून नेमले होते, तर पूर्वकाळात रॅनबॅक्सी फार्मा, जेट एअरवेज व स्पाईसजेट या कंपन्यांंनीसुद्धा विदेशी तज्ज्ञ व्यक्तींवर कंपनीची धुरा सोपवली होती.

भारतातील आपल्या कंपनीच्या विविध व्यवसायांच्या प्रमुखपदी विदेशी तंत्रज्ञ वा विषय तज्ज्ञांची नेमणूक करण्यामध्ये टाटा उद्योग समूहाने आघाडी घेतलेली दिसते. यासंदर्भात प्रमुख उदाहरणे म्हणून टाटा उद्योगांतर्गत असणार्‍या एअर इंडिया, टाटा टेक्नॉलॉजीज, आग्रतास यांचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय, टाटा अंतर्गत असणार्‍या टाटा मोटर्स, विस्तारा, टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांना विदेशी व्यवसायप्रमुख वा मुख्याधिकारी असण्याची पूर्वपरंपरा लाभली आहे.
 
याउलट प्रस्थापित व परंपरागत स्वरूपात ग्राहकोपयोगी उत्पादन करणार्‍या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील, हिंदुस्थान युनी लिव्हर लि. व प्रॉक्टर अ‍ॅण्ड गँम्बल यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या भारतातील उत्पादन-विक्री व्यवसाय विभागात, भारतीय व्यक्तीची प्रमुखपदी निवड झाल्याचा इतिहास आहे. यामध्ये नेल्सले इंडियाचा मात्र अपवाद म्हणायला हवा. कारण, या कंपनीने व्यावसायिक गरजांनुसार विदेशी मुख्याधिकार्‍यांची नेमणूक त्यांच्या भारतातील व्यवसायवाढीसाठी केलेली आहे.
 
यासंदर्भात ‘मॅनेजमेंट डिसिजन जर्नल’तर्फे प्रकाशित करण्यात आलेला अहवाल अभ्यासनीय आहे. २०१८ मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार विकसनशील देशांमधील उद्योग-व्यवसायांच्या प्रमुखपदी संबंधित विकसनशील देशाचे मूळ निवासी असणार्‍या व सध्या विकसित देशातील उद्योगात जबाबदारीसह काम करणार्‍या यशस्वी व कर्तबगार व्यवस्थापकांना आवर्जून स्वदेशी उद्योगात अधिक मोठी व महत्त्वाची जबाबदारी घेण्यासाठी प्राधान्याने बोलावित आहेत. ते विकसनशील देश, त्या कंपन्या व संबंधित उद्योग-व्यवसाय या सार्‍यांनाच या यशस्वी प्रयोगाचे मोठे फायदे झाल्याचे त्यावेळच्या अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले.
 
यानिमित्ताने, विदेशी मुख्याधिकार्‍यांमुळे भारतीय उद्योग व कंपन्या यशस्वी होण्याची कितपत खात्री असते? हा मुद्दासुद्धा चर्चिला गेला. ज्या कारणासाठी विदेशातून व्यवसायप्रमुख आणले जातात, ती उद्दिष्टपूर्ती कितपत होते याचा अभ्यास करणार्‍या ‘एक्झीक्युटिव्ह अ‍ॅक्सेस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक असणारे रोनेश पुरी आपल्या अनुभवातून सांगतात की, “भारतीय कंपन्यांमध्ये विदेशातून आणलेल्या मुख्याधिकार्‍यांपैकी यशस्वी होणार्‍यांचे प्रमाण सुमारे १० ते १५ टक्के असते.”
 
परिणामी, आज भारतातील व भारतीय कंपन्यांमध्ये भारतीय मुख्याधिकारी व व्यवसायप्रमुख नेमण्यावर कल वाढत असून तसा भर दिला जात आहे. रोनेश पुरींच्या मते आज जागतिक स्तरावर उद्योग-व्यवसायवाढ साधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान व यशस्वी व्यवस्थापन तंत्र सर्वसाधारणपणे पुरेसे ठरणार असले, तरी भारतीय उद्योगाला यशस्वी करण्यासाठी तंत्रज्ञान-व्यवस्थापनाच्या जोडीलाच प्रामाणिक व कृतिशील नेतृत्व आणि व्यवसाय-व्यवहाराला भावनात्मक विचार-कृतीची जोड असल्यानेच भारतातील उद्योगांमध्ये भारतीय व्यवसायप्रमुखांचे महत्त्व वाढते राहणार आहे.
 
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत)
संपर्क - ९८२२८४७८८६