संदेशखालीतील महिला अत्याचार प्रकरणी अभाविपकडून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये तीव्र निदर्शने (ABVP Protest Mumbai University) करण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींकडे पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

मुंबई : पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्कार व अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी मंगळवार, दि. ०५ मार्च रोजी देशभरात आंदोलने केली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्येही तीव्र निदर्शने करण्यात आली. दरम्यान संदेशखाली येथील महिला आत्याचाराच्या घटनांची दखल घेत राष्ट्रपतींनी पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महिलांवर होणारे बलात्कार व अत्याचाराच्या घटनांना राजकीय हेतूपोटी एका महिला मुख्यमंत्र्यानी अभय देणे हे धक्कादायक असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. “एखाद्या राज्याची महिला मुख्यमंत्री असताना राज्य सरकार पुरस्कृत महिला बलात्काराच्या घटना होणे ही शरमेची बाब आहे.”, असे म्हणत अभाविपचे मुंबई महानगर सहमंत्री प्रशांत माळी यांनी आंदोलनादरम्यान तीव्र निषेध व्यक्त केला.
हे वाचलंत का? : अभाविपचे देशव्यापी आंदोलन ममतादीदींना पडणार भारी?
“ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारच्या आशीर्वादाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांवर सामूहिक बलात्कार व कमजोर घटकांचे शोषण केले आहे. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचीही गळचेपी करण्याच्या घटना पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था संपुष्टात आल्याचे स्पष्ट करते. त्यामुळे आरोपींवर त्वरीत कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे.”
- निधि गाला, मुंबई महानगर मंत्री, अभाविप