उबाठा आणि शरद पवार गटावरून विश्वास उडाला : प्रकाश आंबेडकर

19 Mar 2024 15:20:01
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात समन्वय होताना दिसत नाही. यातच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उबाठा आणि शरद पवार गटावरून उडाला असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना यासंदर्भात पत्रही लिहिले आहे.
 
प्रकाश आंबेडकर आपल्या पत्रात म्हणाले की, "१७ मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. त्यावेळी विस्तृत बोलणे न झाल्याने आज तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे."
 
 हे वाचलंत का? - "राऊत, आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचं बघा!"
 
"शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मविआमध्ये वंचितबद्दल असलेल्या वृत्तीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे," असे ते म्हणाले.
 
 
ते पुढे म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील ७ जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मविआमध्ये आमचा पक्ष पूर्ण मैदानात उतरेल आणि काँग्रेसच्या ७ जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे," असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0