मुंबई : राऊत आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचं बघा, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे. तसेच राऊत हे डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत, असा घणाघातही त्यांनी केला. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात सध्या मनसे महायूतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, नुकतीच राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेटही घेतली. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. त्यानंतर आता यावर प्रतिक्रिया देताना अतुल भातखळकर म्हणाले की, "राऊतांना म्हणावं की, आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचं बघा. वंचितबरोबर काही जमतंय का ते बघा. राऊत हे डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानांना कोणीही सिरियसली घेत नाही."
ते पुढे म्हणाले की, "राज ठाकरे सोबत आल्यास केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होणार आहे. महायूतीच्या ४५ जागा नक्की निवडून येणार आहेत. राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये आला तर त्याचं निश्चित स्वागत आहे आणि त्याचा फायदा निश्चित आगामी राजकारणामध्ये १०० टक्के होईल."
तसेच "गेल्या दोन वर्षांपासून राज्यात महायूतीचं सरकार आहे. सगळे राजकीय पक्ष आणि अनेक नेतेमंडळी मोदीजींच्या विकासाच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून या विचारात सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे राज ठाकरेदेखील सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे," असेही ते म्हणाले आहेत.