संजय राऊत खोटं बोलतात! प्रकाश आंबेडकरांचा आरोप

12 Mar 2024 16:43:30

Sanjay Raut & Prakash Ambedkar


मुंबई : संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असून अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटप पुर्ण झालेले नाही. यातच आता प्रकाश आंबेडकरांनी राऊतांवर हा आरोप केला आहे.
 
प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "वंचित जागा वाटपासाठी कारणीभूत नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात १० जागांवरुन मतभेद आहेत. दुसरीकडे, उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटात पाच जागांचे वाटप होत नाहीये. एकही जण त्या जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे या जागांवर त्यांचा समझौता होत नाहीये."

हे वाचलंत का? - वसंत मोरेंचा निर्णय योग्य! माजी मनसे नेत्याकडून ऑफर
 
"संजय राऊत माध्यमांशी बोलताना खोटं बोलतात. वंचितने आमच्याकडे जागाच मागितल्या नाही, असं ते म्हणतात. पण त्यांच्यातील भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का, याचा निर्णय त्यांनी अजून लावलेला नाही. त्यामुळे वंचित त्यांना एवढंच म्हणते की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आधी तुमचं मिटवा," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "हे काही होत नाही, असं लक्षात आल्याने मी रमेश चेन्नीथला यांच्याशी चर्चा करुन त्यांना विनंती केली की, ते घोंगडं भिजत असलं, तरी काँग्रेस आणि वंचित यांच्यामध्ये असलेला समझौता तरी आपण पुढे घेऊन जाऊ. पण रमेश चेन्नीथला यांच्याकडून यावर काहीही पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे आज आम्ही थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना माझ्या सहीचं पत्र पाठवलं. या पत्रात सगळी हकीगत नमूद केली आणि त्यांना विनंती केली की, काँग्रेस पक्षाने मविआकडे मागितलेल्या जागा आणि वंचित यांच्यात समझौता करुया. परंतू, अजूनपर्यंत काँग्रेसच्या कार्यालयातून याला दुजोरा मिळालेला नाही," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0