नवी दिल्ली : दिल्ली आणि आसपासच्या भागातील कथित शेतकरी आपल्या मागण्या घेऊन ट्रॅक्टर आणि इतर वाहनांसह राजधानी दिल्लीत पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील शंभू सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकांचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, या कथित मोर्चावेळी पोलिसांवर दगडफेक, शंभू सीमेवर गोंधळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यावेळी व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करतानाच आमच्या रोजगारावर लाथ मारू नका, असा नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे, या सर्वप्रकारामुळे संपूर्ण सीमा सील करण्यात आली असून दिल्लीचा लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे दिल्लीच्या केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनचे गेट दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहिले. शेतकरी आंदोलनाबाबत दिल्लीसह हरियाणामध्येही कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच, चंदीगडमध्ये शाळा बंद करण्यात आल्या असून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांना ट्रॅफिक जॅम लक्षात घेऊन त्यांच्या नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.