नाशिक : नाशिक मधील वसंत नाईक यांच्या शिक्षण संस्थेची हक्काची जमीन हि वक्फ बोर्डाने ताब्यात घेतली असून त्याचा खटला न्यायालयात सुरु आहे. या प्रमाणेच नाशिकमधील अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. आणि त्या जागांवर मोठंमोठे दर्गे, मशीदी उभारल्या जात आहेत हा समस्त हिंदुसाठी चिंतेचा विषय असून सर्व हिंदूंनी एकत्र येवून वक्फ बोर्डा विरोधात आवाज उठवत वक्फ बोर्ड रद्द केले पाहिजे. असे आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'च्या समारोप कार्यक्रमात केले.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. वक्फ बोर्ड रद्द झालेच पाहिजे, मोठ्या प्रमाणावर झालेले अल्पसंख्याकांचे अतिक्रम हटवावे, दहशवाद्यांना पोसणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा हलाल सर्टिफिकेट देणे बंद करावे, या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
नितेश राणे पुढे म्हणाले की, ज्याला आपण हिंदू राष्ट्र आपलं राष्ट्र समजतो त्याच राज्यात वफ्फ बोर्डासारख्यांची दादागिरी वाढत चालली असून वेळीच त्यांना रोखलं पाहिजे अन्यथा उद्या हिंदूंच्या घरच्या जमिनी देखील बळकावल्या जातील. यासाठी प्रत्येक हिंदूने पेटून उठले पाहिजे व वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.
बी. डी. भालेकर मैदानावरुन मार्गस्थ झालेला मोर्चा शालिमार, शिवाजी रोडमार्गे डॉ. आंबेडकर पुतळा, बागुल कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भारतानंद सरस्वती, काजल हिंदुस्थानी, सुरेश चव्हाणके उपस्थित होते. राष्ट्रगीताने मोर्च्याची सांगता करण्यात आली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चाला शहर पोलीस आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला. चोख बंदोबस्त असल्याने मोर्चास कुठेही गालबोट लागले नाही. मोर्चासाठी दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दलासह दहशतवादी विरोधी कक्षाच्या पथकांसह शहरातील तीन सहायक आयुक्तांसह पाचशेपेक्षा जास्त अंमलदारांच्या बंदोबस्त होता.