भाजप हा भावनाप्रधान आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष : गोपाळ शेट्टी; माघार घेत स्पष्ट केली भूमिका

04 Nov 2024 13:36:41
 
Gopal Shetty
 
मुंबई : "भाजप हा भावनाप्रधान आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. मला अनेक नेते समजवायला आणि भेटायला आलेत. त्यामुळे मी निवडणूकीतून माघार घेत आहे," अशी घोषणा भाजप नेते गोपाळ शेट्टींनी केली आहे. त्यांनी बोरिवली विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोपाळ शेट्टींनी आपला अर्ज मागे घेण्याची घोषणा केली.
 
गोपाळ शेट्टी म्हणाले की, "मी ही निवडणूक आमदार होण्यासाठी लढत नाही, असे मी पहिल्या दिवसापासूनच सांगत आलो आहे. तसं असतं तर मी अन्य पक्षात जाऊन लढलो असतो. मला तशी ऑफरही आली होती. पण मी पक्ष सोडणार नाही, असेही म्हटले होते. माझी लढाई ही एका विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. भाजप हा एक भावनाप्रधान पक्ष आहे. पक्ष कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतो. त्यामुळे गोपाळ शेट्टी जे करतात ते करू द्या, काय फरक पडतो? असा विचार न करता अनेक नेते मला एकदा नव्हे अनेकदा समजवायला आणि भेटायला आलेत. त्यामुळे मी माघार घेत आहे."
 
हे वाचलंत का? -  विधानसभा निवडणूकीतून जरांगेंची माघार! हे आहे कारण...
 
"माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. लोक मला सातत्याने छळत होते. पण मी कधीही ते घेऊन पक्षासमोर गेलो नाही. गोपाळ शेट्टींना सर्व काही विचारून केलं जातं, अशीही एक चर्चा होती. पण मला यातलं काहीच माहिती नाही, हे सिद्ध करण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. आता माझं म्हणणं पक्षश्रेष्ठींकडे पोहोचलं आहे. भविष्यात कुठलाच बाहेरचा उमेदवार आणू नये, या मताचा मी नाही. कारण एखादा कमजोर मतदारसंघ असल्यास पक्षाच्या आणि लोकांच्या हितासाठी उमेदवार आणावा लागतो. परंतू, हे कळत नकळत सातत्याने झालं आहे. त्यामुळे मला हे करावं लागलं. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. त्यामुळे मी पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0