मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "काहीही झालं तरी मी निवडणूक लढवावी, असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. दोन महिन्यांपासून आम्ही गावागावांत जाऊन दौरे करत आहोत. त्यामुळे आज विधानसभा निवडणूकीसंदर्भात आपण नेमका काय निर्णय घ्यायचा यासाठी ४-५ दिवसांपूर्वी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती त्यांनी सांगितलं की, इंदापूरची जागा ही विद्यमान आमदारच लढवणार आणि तुमच्यासाठी आपण दुसरा पर्याय काढू. परंतू, या दुसऱ्या पर्यायाला माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांचीही संमती नव्हती."
हे वाचलंत का? - "ठाकरेंनी मेव्हण्याला वाचवण्यासाठी जेवढा पाठपुरावा केला तेवढा..."; नितेश राणेंचा घणाघात
"त्यानंतर मला शरद पवार साहेबांचा भेटण्यासाठी निरोप आला. काल त्यांच्याशी दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या आणि जयंत पाटलांशी फोनवर बोलणं झालं. पवार साहेबांनी मला सांगितलं की, मी इंदापूर तालुक्याचा कानोसा घेतला आहे. तुमच्याही कार्यकर्त्यांची ईच्छा असल्यास तुम्ही आमच्या पक्षात यावं. मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्यावर त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी शरद पवारांच्या पक्षात जाणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "इंदापूर तालुक्यातील जनतेची भूमिका महत्वाची आहे. गेली दहा वर्षे जी माणसं आमच्यामागे ठामपणे उभी राहिली त्यांना खूप त्रास झाला. विकासकामांऐवजी गावांमध्ये अन्याय झाला. त्यामुळे आता जनतेचा उद्रेक झाला आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही हा निर्णय घेतला आहे," असेही ते म्हणाले.