मुंबईतील गाईंचा निवारा धोक्यात ?

    29-Sep-2022
Total Views |

cowshed
 
 
मुंबई : पूर्वीपासूनच गोमातेला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. अनेक ग्रंथ व पुराणांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मात्र मुंबईतील शिवडी परिसरातील गायवाडी येथे मात्र गाईंना म्हणजेच गोमातेला राहण्यासही नीटनेटका गोठा मिळत नसल्याची धक्कादायक बाब येथीलच स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना उघड केली.
 
 
शिवडी येथील गायवाडी म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते वामनराव महाडिक यांनी वसविलेली वस्ती. येथे पूर्वीपासून गोसावी समाजातील नागरिक वास्तव्यास आहेत. मंदिराबाहेर गाईंना नेऊन तेथे मिळणाऱ्या थोड्याफार पैशात आपला उदरनिर्वाह हे चालवतात. मात्र आज यांच्या गाईंच्या वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे येथील स्थानिकांनी म्हटले आहे.
 
 
तब्बल १०० गाई यांच्याकडे आहेत. विकासकाने घर बांधून दिलं. मात्र आमच्या गाईंना गोठा मात्र अद्याप बांधून देत नाहीत. आमच्या गाई उन्हात - पावसात भिजत असतात. पण आम्हाला विकासक गोठा बांधून देण्यास तयार नाही. तसेच यासंदर्भात स्थानिक प्रशासन देखील कोणतीच पावले उचलत नसल्याचेही येथील स्थानिकांनी स्पष्ट केले.
 
 
त्याचप्रमाणे या परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेकडे मुंबई महापालिका लक्ष पुरवीत नाही मात्र गाईंच्या बाबतीत आम्हाला फाईन मारण्यास मुंबई महापालिकेचे अधिकारी पुढे येतात. आम्हाला आमच्या गाईंसाठी केवळ एक स्वच्छ गोठा मिळावा एवढीच आमची मागणी आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने देखील आमच्या समस्यकडे लक्ष पुरवावे अशी विनंती देखील येथील स्थानिकांनी केली आहे.
 
 
तेथील स्थानिक आमच्यापर्यंत आल्यास आम्ही नक्की त्यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू. यापूर्वीही कोणाच्या किती गाई आहेत त्यांचा तपशील लिहून मला द्या असे त्यांस मी सांगितले होते. मात्र माझ्यापर्यंत कोणताच तपशील पोहचलेला नाही. तेथील नागरिक माझ्यापर्यंत आलेलेच नाहीत. त्यांनी तक्रार आणि सर्व तपशील माझ्यापर्यंत पोहचवावेत. मी त्वरित ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करिन.
- श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक, शिवसेना


- शेफाली ढवण