भोपाळ : देशात करोना संक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बलाढ्य देश देखील कोरोनाच्या प्रकोपासमोर हतबल ठरत असल्याचे दिसते आहे. अशावेळी वेगवेगळ्या स्तरांवर सरकार आणि प्रशासन या संकटाचा सामना करताना आढळून येत आहेत. एका बाजूला संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असताना, त्यांच्या चाचण्यांसाठी अविरत प्रयत्न करत असताना दुसरीकडे 'अयोध्येत राम मंदिरासाठी भूमिपूजन झाले आणि मंदिराच्या कामाला सुरुवात झाली की कोरोनाचा शेवट सुरू होईल,' असे विधान मध्य प्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी केले आहे.
ते म्हणाले, 'त्यावेळी दानवांचा वध करण्यासाठीच प्रभू श्रीरामांनी अवतार धारण केला होता. त्यामुळे राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोना महामारीचाही खात्मा सुरू होईल,'असा विश्वास शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. 'भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. आपण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. याशिवाय आपल्या देवाचेही स्मरण करत आहोत,' असेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यानंतर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन यावेळी करण्यात येणार आहे.