जीवनावश्यक सेवा वगळून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार ‘ही’ चार शहरं
मुंबई : कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यत ही बंदी राहणार असून आज मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. तसेच रेल्वे, बसेस आणि बँका या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद करण्यात येणार नसल्याचे सांगतानाच रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका. गर्दी टाळा, असे आवाहनही त्यांनी राज्यातील नागरिकांना केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधत मोठा निर्णय जाहीर केला. जगण्यासाठी लोक धडपडतात, संघर्ष करतात. आता जगण्यासाठी घरात बसावे लागत आहे. संपूर्ण जगाला घरात राहावे लागत आहे. त्यामुळे तुम्ही घरात राहा. हे युद्ध आहे, संपर्क आणि संसर्ग टाळूनच हे युद्ध जिंकता येतं. संपर्क आणि संसर्ग हे या युद्धाचे हे दोन शस्त्र आहेत. त्यामुळे घरातच थांबा, बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.