स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेविरोधात रान उठवले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशात आपल्या कार्यकर्त्यांना एका पुस्तकाचे वाटप केले. त्यात वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. दरम्यान, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राऊत म्हणाले, "वीर सावरकर एक महान व्यक्ती होते, आणि नेहमी राहतील. एक गट नेहमीच सावरकरांबाबत चुकीचे बोलत असतो. यावरून त्यांचे विचार किती गलिच्छ आहेत हे समजते. "
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. "आमचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. ही त्या पक्षाची बौद्धीक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार, की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. भारतीय जनता पार्टी या पुस्तकाचा तीव्र निषेध करते. हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर पहिली प्रतिक्रिया त्यांनीच आपल्या खास शैलीत दिली असती. आज तशी अपेक्षा करता येत नसली तरी या पुस्तकावर तत्काळ बंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी अपेक्षा आहे." असे फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही यावरून शिवसेनेला लक्ष केले आहे, ते म्हणाले, "मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसप्रणित राष्ट्र सेवा दलाने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक पुस्तिका प्रकाशित करुन, त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या कृतीचा तीव्र शब्दांत आम्ही निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाची आता परिसीमा गाठली जात असून सावरकर प्रेमी मंडळींच्या सहनशक्तीचा आता अंत होत आहे. म्हणूनच, या कृतीचा धिक्कार करून स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानासाठी सर्व राष्ट्रभक्त मंडळींनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.