नऊ महिने गर्भारपणाच्या वेदना सहन केल्या. जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र काही महिन्यांनीच चाचण्यांमधून समोर येतं, की या बाळांशी आई- वडिलांचा कोणताच जैविक संबंध नाही. ऐकायला जरा विचित्रच आहे, पण हरियानातील गुरुग्राममधल्या एका आयव्हीएफ सेंटरमधून उघड झालेल्या या प्रकरणाने हजारो जोडप्यांच्या मनात भीती निर्माण केलीय. IVF म्हणजे आशेचा किरण, मात्र आता या आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली नक्की काय सुरू आहे? हे प्रकरण काय आहे? आयव्हीएफ प्रक्रियेत अशी चूक कशी होऊ शकते? कायदा आणि नियमन काय सांगतं? सविस्तर जाणून घेऊयात.... (Gurugram IVF Case)
१९८६ मध्ये कोलकाता येथे तज्ञ डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांनी भारतात पहिल्यांदाच आयव्हीएफ पद्धतीची सुरुवात केली. त्यानंतर अनेक निराश दांपत्यांसाठी ही प्रक्रिया आशेचा नवा किरण ठरली. स्वतःचे अपत्य होण्याची शक्यता जवळपास संपली असे वाटणाऱ्या अनेक कुटुंबांनी आयव्हीएफच्या माध्यमातून पालकत्वाचे स्वप्न पूर्ण केले. मात्र आता याच वैद्यकीय प्रक्रियेबाबत एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. (Gurugram IVF Case)
गुरुग्राममध्ये आयव्हीएफ प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचा दावा एका दांपत्याने केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार आयव्हीएफद्वारे जन्मलेल्या जुळ्या मुलांचा त्यांच्याशी कोणताही जैविक संबंध नसल्याचे, डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर संबंधित दांपत्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला असून, वैद्यकीय क्षेत्रात आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या नियमनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मी बाळांना जन्म दिला, मग माझा डीएनए जुळत कसा नाही?” असा व्यथित सवाल आईने उपस्थित केला आहे. (Gurugram IVF Case)
ही घटना जुळ्या बाळांच्या जन्मानंतर काही महिन्यांनी उघडकीस आली. सुरुवातीला बाळांच्या आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्येमुळे त्यांना नियमित तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलांमध्ये काही विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये दिसून आली, ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांची सखोल 'जनुकीय तपासणी' करण्याचा सल्ला दिला. आणि त्यानंतर झालेल्या डीएनए चाचणीत मोठी विसंगती आढळून आली. या निकालामुळे त्या मुलांचा त्यांच्या आई-वडिलांशी कोणताही जैविक संबंध नसल्याचे समोर आले. (Gurugram IVF Case)
या धक्कादायक निष्कर्षानंतर कुटुंबाने काही शक्यता व्यक्त केल्या. त्यांच्या मते, आयव्हीएफ केंद्राकडून दुसऱ्या जोडप्याचे भ्रूण त्यांच्या शरीरात प्रत्यारोपित झाले असावे किंवा जन्मानंतर बाळांची अदलाबदल झाली असावी. मात्र नेमकी चूक कुठे झाली, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. संबंधित केंद्राशी, भ्रूणशास्त्र टीमशी आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र आवश्यक कागदपत्रे, नोंदी आणि फाइल्स देण्याबाबत केंद्राकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप या कुटुंबाकडून करण्यात आलाय. (Gurugram IVF Case)
या प्रकरणात वडील राहुल राठोड यांनी सांगितले की, बाळे त्यांच्यापेक्षा वेगळी दिसू लागली. “लहान बाळ ईशान्य भारतातील लोकांसारखे दिसत होते,” तर आईनेही “आमची मुले कुठे आहेत? आम्ही तिथे स्वतःची मुले मिळावीत म्हणून गेलो होतो,” अशी भावना व्यक्त केली आहे. (Gurugram IVF Case)
कुटुंबाने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यात तीन महिन्यांचा विलंब झाला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ५ जून रोजी आयव्हीएफ केंद्राशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशांनंतरही अद्याप ठोस कारवाई न झाल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यामुळे तपासाच्या वेगावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Gurugram IVF Case)
कायदे तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची घटना ही सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायद्याचे गंभीर उल्लंघन ठरू शकते. नियमांनुसार भ्रूण प्रत्यारोपणापूर्वी इलेक्ट्रॉनिक बारकोडिंग, पडताळणी प्रक्रिया आणि दोन स्वतंत्र भ्रूणवैज्ञानिकांच्या दुहेरी स्वाक्षरीची आवश्यकता असते. या प्रकरणात या प्रक्रिया पाळल्या गेल्या का, याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. जर या पायऱ्या वगळण्यात आल्या असतील, तर ते केवळ निष्काळजीपणाचे नव्हे, तर गंभीर वैद्यकीय चुकीचे उदाहरण मानले जाऊ शकते. (Gurugram IVF Case)
आयव्हीएफ प्रक्रियेतील अशा प्रकारच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. दिल्लीतील एका प्रकरणात जनुकीय मिक्स-अपमुळे पालकांपेक्षा पूर्णपणे वेगळा रक्तगट आणि डीएनए प्रोफाइल असलेले मूल जन्माला आले होते. त्या प्रकरणात संबंधित क्लिनिकला मोठा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे गुरुग्राममधील हे प्रकरणही केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून, संपूर्ण सहाय्यक प्रजनन व्यवस्थेतील पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारी यांवर प्रश्न उभे करणारे ठरत आहे. (Gurugram IVF Case)
सध्या राहुल राठोड आणि त्यांच्या पत्नीचे प्रकरण तपासाधीन आहे. या तपासातून नेमकी चूक कुठे झाली, भ्रूण प्रत्यारोपणात गोंधळ झाला का, की बाळांची अदलाबदल झाली, याचा उलगडा होणे अपेक्षित आहे. एकीकडे आयव्हीएफ अनेक कुटुंबांसाठी आशेचा आधार ठरतो, तर दुसरीकडे अशा घटना त्या विश्वासालाच धक्का देणाऱ्या ठरतात. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वैयक्तिक तक्रार म्हणून नव्हे, तर वैद्यकीय नियमन आणि रुग्णांच्या हक्कांच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. (Gurugram IVF Case)