मुंबई : Narendra Modi "इतिहासात अनेक आक्रमकांनी सोमनाथ मंदिरावर हल्ले करून त्याचे वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कधीही यश आले नाही. जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही किंवा कोणत्याही दबावाखाली आणू शकत नाही", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी रविवारीपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी गिर सोमनाथ येथे भव्य रोड शो केला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'सोमनाथ अमृत पर्व-२०२६' आयोजित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथ मंदिरात जाऊन कुंभाभिषेक आणि पूजा-अर्चनेत सहभाग घेतला.
दि. ११ मे १९९८ रोजी झालेल्या पोखरण अणुचाचणी चा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यावेळी संपूर्ण जग भारताच्या विरोधात उभे राहिले होते. अणुचाचणीनंतर भारतावर विविध प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आणि जगभरातून दबाव निर्माण करण्यात आला, तरीही भारत मागे हटला नाही. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५०० हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून देश एकसंघ केला आणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्पही पूर्ण केला.
पुढे ते म्हणाले की, आक्रमकांनी सोमनाथ मंदिराला केवळ एक भौतिक रचना समजले आणि म्हणूनच ते वारंवार उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र प्रत्येक वेळी सोमनाथ पुन्हा उभा राहिला, कारण भारताची वैचारिक शक्ती आक्रमकांना समजू शकली नाही. भारतीय संस्कृती भौतिक शरीराला नश्वर मानते, पण त्यामधील आत्मा अविनाशी असल्याचे सांगते. भगवान शिव हे सर्वात्मा आहेत आणि हीच भारताच्या सनातन चेतनेची सर्वात मोठी ताकद आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक