मुंबई : (Deshraj Sharma) शिक्षण हे भारताच्या सांस्कृतिक मूल्यं आणि परंपरांशी सुसंगत असले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी आपल्या वारशाशी जोडलेले राहून राष्ट्रनिर्मितीत प्रभावी योगदान देऊ शकतील, असे प्रतिपादन विद्या भारतीचे अखिल भारतीय महामंत्री देशराज शर्मा यांनी केले. दिल्ली प्रांतातील समर्थ शिक्षण समिती संचालित महाशय चुन्नीलाल सरस्वती बाल मंदिर सीनियर सेकंडरी स्कूल, हरिनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी देशातील विद्यमान शिक्षणव्यवस्था, विविध शैक्षणिक उपक्रम, गेल्या वर्षातील उपलब्धी आणि भविष्यातील उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेचा उद्देश विद्या भारतीच्या नव्या शैक्षणिक संकल्पनांची मांडणी करणे तसेच तिचे शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक योगदान समाज आणि माध्यमांसमोर ठेवणे हा होता.
देशराज शर्मा यांनी सांगितले की, विद्या भारतीचे उद्दिष्ट सांस्कृतिकदृष्ट्या भक्कम आणि जागतिक स्तरावर सक्षम अशा भावी पिढीची जडणघडण करणे आहे. सध्या विद्या भारती देशभरातील सुमारे २४,००० औपचारिक आणि अनौपचारिक संस्थांद्वारे मूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण शिक्षण देत असून, ती भारतातील सर्वात मोठ्या बिगर-सरकारी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. संस्था ११ प्रादेशिक कार्यालये, ४६ प्रांतीय समित्या आणि ६८४ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून व्यापक पोहोच सुनिश्चित करते.
विद्या भारतीच्या संस्थांमध्ये सध्या ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर १.५ लाखांहून अधिक शिक्षक (आचार्य) कार्यरत आहेत. याशिवाय, सेवा उपक्रमांतर्गत हजारो संस्कार केंद्रांद्वारे २.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत मूलभूत शिक्षण दिले जाते. या संस्कार केंद्रांच्या माध्यमातून संस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना साक्षरता व अंकज्ञान कौशल्ये देत मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांत ‘एकल विद्यालय’ देखील शिक्षण, सामाजिक जागृती आणि समुदाय सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
विद्या भारतीच्या शिक्षणपद्धतीत शारीरिक शिक्षण, योग, संगीत, संस्कृत तसेच नैतिक व आध्यात्मिक शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मातृभाषा आधारित शिक्षण आणि ‘पंचपदी’ अध्यापन पद्धतीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवोन्मेष प्रोत्साहनासाठी देशभरातील ५०७ शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नवकल्पना विकसित होत आहेत. संस्थेने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच भारतकेंद्री आधुनिक शिक्षणव्यवस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. यासाठी विषयतज्ज्ञांना प्रशिक्षण देऊन शाळास्तरावर कार्यरत करण्यात येत आहे.
दरम्यान, दि. ३ ते ६ एप्रिल या कालावधीत हरिनगर येथील याच परिसरात वार्षिक सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात येणार असून, देशभरातून सुमारे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत शैक्षणिक योजना, धोरणे आणि संघटनात्मक बाबींवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक