मुंबई : ( Indian Railway ) सामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक परवडणारा, सुरक्षित आणि सुसह्य करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने मोठे पाऊल टाकले आहे. पायाभूत सुविधा आधुनिकीकरण, प्रवासी-केंद्रित सुधारणा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांमुळे रेल्वेने ‘पॅसेंजर फर्स्ट’ धोरण अधिक ठोसपणे राबवायला सुरुवात केली आहे. विशेषतः जनरल आणि नॉन-एसी प्रवाशांसाठी सुरू असलेली ही वाटचाल सामान्य माणसाच्या दैनंदिन प्रवासात दिलासा देणारी ठरत आहे.
वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, भारतीय रेल्वेने आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा जनरल आणि नॉन-एसी डब्यांच्या निर्मितीत विक्रमी कामगिरी केली आहे. परवडणाऱ्या दरात अधिक आरामदायी प्रवास देणाऱ्या या डब्यांमुळे प्रवासी वहन क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये तब्बल ४,८३८ नवीन एलएचबी प्रकारचे जनरल व नॉन-एसी डबे तयार करण्याचे नियोजन असून, पुढील २०२६–२७ मध्ये ४,८०२ डब्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे सुरक्षितता, प्रवासी आराम आणि सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी हाताळण्यासाठीही रेल्वेने अभूतपूर्व पातळीवर विशेष गाड्या चालवल्या. २०२५ या वर्षात तब्बल ४३ हजारांहून अधिक विशेष फेऱ्या चालवण्यात आल्या. महाकुंभ, होळी, उन्हाळी सुट्ट्या आणि छठ पूजा यांसारख्या काळात चालवलेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांची कोंडी कमी झाली आणि वेळेवर प्रवास सुलभ झाला. ही व्यवस्था केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता, लाखो प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा घडवून आणणारी ठरली.
स्थानकांवरील गर्दी नियंत्रणासाठीही रेल्वेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. देशभरातील ७६ प्रमुख स्थानकांवर प्रवाशांसाठी स्वतंत्र ‘होल्डिंग एरिया’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी दिल्ली स्थानकावर उभारण्यात आलेल्या यशस्वी ‘यात्री सुविधा केंद्रा’च्या धर्तीवर ही व्यवस्था असणार असून, शौचालये, तिकीट काउंटर, स्वयंचलित तिकीट मशिन्स आणि मोफत पिण्याचे पाणी अशा सुविधा येथे उपलब्ध असतील. २०२६ च्या सणासुदीच्या हंगामापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
तिकीट दलाली आणि गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेने आधार-आधारित पडताळणी सक्तीची करत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. आता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच परवानगी दिली जाते. याचा परिणाम म्हणून ५.७३ कोटी संशयास्पद आणि निष्क्रिय आयआरसीटीसी खाती बंद किंवा निलंबित करण्यात आली आहेत. यामुळे खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीतही रेल्वेने मोठी गुंतवणूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात सुरक्षिततेसाठीचा अर्थसंकल्प तब्बल १.१६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, त्यातील ८४ टक्के निधी आधीच वापरण्यात आला आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, धुक्यातील सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या ही या बदलाची ठळक ओळख ठरत आहेत. पूर्णतः नॉन-एसी असलेल्या या गाड्यांमध्ये स्लीपर आणि जनरल डबे असून, परवडणाऱ्या दरात दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्यात येतो. सध्या देशभरात अशा ३० अमृत भारत गाड्या धावत असून, प्रादेशिक संपर्क मजबूत करण्यासाठी नमो भारत रॅपिड रेल सेवाही कार्यरत आहेत.
परवडणारी क्षमता वाढवणे, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षितता, पारदर्शक तिकीट व्यवस्था आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा या सर्व बाबींच्या जोरावर भारतीय रेल्वे हळूहळू पण ठामपणे आधुनिक, समावेशक आणि सामान्य प्रवाशांच्या गरजांवर केंद्रित अशी वाहतूक व्यवस्था उभारत आहे. ही केवळ रेल्वेची सुधारणा नाही, तर कोट्यवधी प्रवाशांच्या रोजच्या प्रवासात होणारा सकारात्मक बदल आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.