Bangladesh Protest : बांगलादेशात आणखी एका हिंदू नागरिकाची हत्या

Total Views |
 
Bangladesh Protest
 
मुंबई : (Bangladesh Protest) बांगलादेशात हिंदूंच्या हत्येचे सत्र दिवसागणिक चालूच आहे. सोमवारी रात्री नरसिंगडी जिल्ह्यातील चारसिंदूर येथील किराणा दुकान चालवणारे मणी चक्रवर्ती यांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. ही घटना भर बाजारात घडल्याने तिथे व्यवसाय करणाऱ्या अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Bangladesh Protest)
 
मिळालेल्या माहितीनुसार, मणी चक्रवर्ती हे चारसिंदूर येथील बाजारात किराणा दुकान चालवत होते. सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत हिंदू नागरिकाची हत्या झाल्याची ही दुसरी घटना आहे, तर मागील १८ दिवसांतील ही सहावी घटना आहे. (Bangladesh Protest)
 
बाजारातील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मणी यांचा स्वभाव शांत होता. तसेच ते एक प्रतिष्ठित व्यापारी होते. त्याचे कोणाबरोबर कधी वाद झाल्याचे कोणी पाहिले नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यामुळेच मणी चक्रवर्तीची हत्या करणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. (Bangladesh Protest)
 
हेही वाचा : Navnath Ban : महाराष्ट्र विकासावर चालतो टोमण्यावर नाही : नवनाथ बन 
 
१८ दिवसांतील सहावी घटना
 
१२ डिसेंबर रोजी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. सिंगापूरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना १९ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असून अनेक ठिकाणी हिंदूंवर हल्ले केले गेले. सर्वात आधी उत्तर बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या २७ वर्षीय दीपू चंद्र दास याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. त्याचा मृतदेह झाडाला बांधून पेटवण्यात आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांची जमावाने मारहाण करत हत्या केली होती. सोमवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये राणा प्रताप व मणी चक्रवर्ती यांची हत्या झाली आहे. (Bangladesh Protest)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.