मुंबई :( Waris Pathan ) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौरपदावरून राजकीय वाद तीव्र होत आहे. याचदरम्यान एआयएमआयएम नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी एक वक्तव्य केले. 'कलमा पढणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनावी हेच आमचे स्वप्न आहे,' असे ते म्हणाले. ते धारावी येथील वॉर्ड क्रमांक १८८ चे उमेदवार मुनव्वर अली यांच्या प्रचार सभेला संबोधित करत होते.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर फक्त हिंदू मराठीच असेल, असे विधान केले होते. त्यावरून पठान हे टीका करत म्हणाले की, त्यांना वाटत असेल की महापौर हिंदू आणि मराठी होईल, परंतु आमचे स्वप्न आहे की एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर व्हावी.
यावेळी वारिस पठाण यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. मुस्लिम मतांवर हक्क सांगणारे पक्ष या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'लोकशाहीमध्ये कोणत्याही एका धर्माला किंवा जातीला सत्तेचा मक्ता देता येत नाही,' असे म्हणत पठाण यांनी या वादावर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना उघड भूमिका घेण्याचे आवाहन केले.
वारिस पठान म्हणाले, ‘आय लव महादेव’ चे नारे देणारा महापौर होऊ शकतो तर हिजाब घालणारी आणि कलमा पढणारी मुस्लिम महिला महापौर का होऊ शकत नाही. मुस्लिम महिलाच नाही तर शेख, पठान किंवा कुरैशीसुद्धा महापौर होऊ शकतो.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.