‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे गाणे मुंबईत चालणार नाही
मस्ती उतरवण्याचा मंत्री नितेश राणे यांचा इशारा
03-Jan-2026
Total Views |
मुंबई : ( Nitesh Rane ) मुंबईजवळील नायगाव येथे एका सलूनमध्ये ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ असे गाणे वाजवल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी याची गंभीर दखल घेतली असून, मुंबईत राहून पाकिस्तानच्या घोषणा देणार्यांची मस्ती देवाभाऊंचे बुलडोझर उतरवतील, असा इशारा त्यांनी दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथील ‘रुहान हेअर कटिंग सलून’मध्ये अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (वय २५) याने हे गाणे लावले होते. पोलीस उपनिरीक्षक पंकज किलजे गस्तीवर असताना त्यांना हे वादग्रस्त गाणे ऐकू आले. त्याबद्दल किलजे यांनी तातडीने कारवाई करत अब्दुल शाह याला अटक केली.
अब्दुल शाह मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगढचा रहिवासी आहे. त्याच्या मोबाईलवरून ‘ब्लूटूथ’द्वारे स्पिकरवर हे गाणे मोठ्या आवाजात लावले होते. पोलिसांनी आरोपीला अटक करताना ज्या मोबाईलमध्ये हे गाणे सुरू होते, तो मोबाईलदेखील जप्त केला. याबाबत नायगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ‘कलम १९७(१)(डी)’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या प्रकाराबाबत चीड व्यक्त केली. त्यांनी ‘एस’ माध्यमावर ट्विट करत सांगितले, "मुंबईत राहून ’कश्मीर बनेगा पाकिस्तान’चे नारे चालणार नाहीत. यांची सगळी मस्ती आमच्या देवाभाऊचे बुलडोझर उतरवतील! जय श्री राम.”