
फील्ड मार्शल के. एम. (कोदंडेरा मदाप्पा) करिअप्पा हे आधुनिक भारतीय सैनिकी इतिहासातले एक फार महत्त्वाचे नाव आहे. फाळणीमुळे जसा भारताचा भूप्रदेश पाकिस्तानाकडे गेला, तशीच सेनादलांचीही विभागणी करावी लागली. साहजिकच, सैन्याचे सगळे संघटन पार विस्कळीत होऊन गेले. त्यातच विलीन झालेल्या संस्थानांच्या सैन्यांची मूळ भारतीय सैन्याशी जुळणी-जोडणी करून घेणे, हे पण एक काम होते. अत्यंत किचकट, वेळखाऊ, संयमाचा अंत पाहणारे हे संघटनात्मक पुनर्रचनेचे कार्य त्यावेळी मेजर जनरल असलेल्या करिअप्पांनी अतिशय कुशलतेने पार पाडले. त्यामुळेच दि. १ जानेवारी १९४९ रोजी काश्मीरच्या विलीनीकरण प्रश्नावरून सुरू झालेले युद्ध संपताच, इंग्रज सेनाप्रमुख जनरल रॉय बुचर यांना निरोप देण्यात आला आणि दि.१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख बनले. तेव्हापासून दि.१५ जानेवारी हा दिवस ‘सेना दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे, हे आता जगभरच्या सगळ्या विद्वानांनी मान्य केलेले आहे. भारतातल्या स्वघोषित विद्वानांना ते अर्थातच मान्य नाही. कारण जे-जे हिंदूंचे, ते-ते अमान्य करायचे असा त्यांचा नियम आहे. त्यामुळेच तर त्यांना विचारवंत म्हटले जाते. असो, तर ‘ऋग्वेदा’त युद्धांची विपुल वर्णने आहेत. आमचे सगळे देवच मुळी शस्त्रधारी आहेत. भगवान विष्णू हा ‘सुदर्शन’ चक्रधारी आहे, भगवान शिव हा ‘त्रिशूलधारी’ आहे, देवांच्या गणांचा प्रमुख गणपती हा ‘पाश’ आणि ‘परशुधर’ आहे, असुरमर्दिनी जगदंबा ‘खड्ग’ आणि ‘भाला’ धारण करते. ‘पुराणे’, ‘रामायण’, ‘महाभारत’ यांमधील रथी, अतिरथी, महारथी हे महान योद्धे चतुरंग दळासमवेत युद्ध करीत होते. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, सम्राट शालिवाहन या दिग्विजयी राजांनी, ग्रीक-शक-हूण-कुशाण आदी परकीय आक्रमक पराभूत करून पचवून टाकले. छत्रपती शिवरायांनी आपल्या ‘भवानी तलवारी’च्या तेजाने पाचही पातशाह्या थरथरा कापविल्या, तर बाजीराव पेशव्याने आपल्या तुफानी घोडदौडीने मुघल पातशाही खिळखिळी करून टाकली.
आधुनिक लष्कर
स्वतंत्र भारताच्या आजच्या अत्याधुनिक लष्कराचा पाया मात्र इंग्रजी राजवटीत घातला गेला. इंग्रजी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने पगारी सैनिक म्हणून, मोठ्या प्रमाणावर भारतीय लढाऊ लोक आपल्या सैन्यात भरती केले. इंग्रजी सेनापतींच्या तालमीत या जवानांनी युरोपातले अत्याधुनिक युद्धतंत्र आत्मसात केले. मूळचाच शूर असलेला भारतीय सैनिक आधुनिक युद्धतंत्रात पारंगत झाल्यावर युरोपियनांनाही भारी ठरतो, याचा प्रत्यय १९१४ ते १८च्या
पहिल्या महायुद्धात आला. इंग्रजी पलटणीने मार खाल्लेल्या रणक्षेत्रात, भारतीय पलटण उतरवण्यात आली. या पलटणीने संयम, चिकाटी आणि योग्य वेळी जबरदस्त आक्रमण यांचा मिलाफ करून, समोरच्या कडव्या जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावली. ही घटना फ्रान्समध्ये घडली. फ्रेंच जनता भारतीय सैनिकांच्या या पराक्रमावर एवढी खूश झाली की, यानंतर कुठेही भारतीय सैनिक दिसले की, ‘हिंदू आले, हिंदू आले’ या शब्दांनी त्यांचे स्वागत केले जात असे.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे जाणते नेतृत्व इंग्रजांची नोकरी करणार्या भारतीय सैनिकांकडे कोणत्या दृष्टीने पहात होते, त्याचा एक फार सुंदर किस्सा लेफ्टनंट जनरल शंकरराव पाटील-थोरात यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केला आहे. इंग्लडच्या ‘सॅण्डहर्स्ट मिलिटरी अॅकेडमी’तून आपले प्रशिक्षण पूर्ण करून थोरात भारतात परत येत होते. त्यांच्याच जहाजात योगायोगाने लाला लजपतरायही होते. दोघांची खूप मैत्री झाली. लालाजींच्या व्यक्तिमत्त्वाने तरुण थोरात अगदी भारावून गेले. ते लालाजींना म्हणाले, "भारतात पोचल्यावर मी ही इंग्रजांची नोकरी सोडून देतो आणि तुमच्या सोबत स्वातंत्र्य आंदोलनात येतो.” त्यावर लालाजी उत्तरले, "छे, छे! अहो, हा इंग्रज आज ना उद्या भारतातून जाणारच आहे. त्यानंतर स्वतंत्र भारताला तुमच्यासारख्या कुशल, तरबेज सेनानायकांची अत्यंत गरज आहे. तेव्हा त्या क्षणावर दृष्टी ठेवून तुमची गुणवत्ता सतत वाढवीत रहा.”
१९४७ची कसोटी
गुणवत्ता वाढवीत राहण्याचा लालाजींचा हा आदेश थोरातांसकट सगळ्याच भारतीय सेनापतींनी पाळला, याचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर लगेचच आला. कारण काश्मीर हिसकून घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या वेशात काश्मीरवर आक्रमण केले. दुसर्या महायुद्धात गाजलेले ब्रिटिश सेनानी जनरल क्लॉड ऑकिनलेक हे
यावेळी भारताचे सेनापती होते; पण ते निवृत्तीच्या वाटेवर होते. त्यामुळे अतिशय त्वरेने लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांना, लष्काराच्या पश्चिम विभागात प्रमुख पदावर आणण्यात आले. करिअप्पा वेगाने कामाला लागले. परिस्थिती कमालीची प्रतिकूल होती. फाळणीमुळे सैन्याची रचना विस्कळीत झाली होती. साधनसामग्री अपुरी होती. निसर्ग प्रतिकूल होता. सगळ्यात मुख्य म्हणजे राजकीय नेतृत्वाला सैनिकी पराक्रम म्हणजे ‘युद्धखोरपणा’ असे वाटत होते.
पण, अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीतून पुढे सरसावतो तोच खरा सैनिक, हे जनरल करिअप्पा आणि त्यांच्या
साहाय्यक अधिकार्यांनी दाखवून दिले. पाकिस्तानी मगराने जवळजवळ पूर्ण गिळलेले काश्मीरचे माणिक त्यांनी, पराक्रमाची शर्थ करून खेचून आणले. करिअप्पांचे सहायक सेनानी मेजर जनरल थिमय्या यांनी तर जगातील सर्वोच्च उंचीवरच्या (११ हजार, ५७५ फूट) झोजिला खिंडीत, ‘७वी लाईट कॅव्हेलरी’ ही रणगाडा तुकडी नेऊन उभी केली. जगभरचे सर्व सेनापती आश्चर्याने थक्क झाले. कारण कोणत्याही सेनापतीने इतक्या उंचीवरच्या ठिकाणी रणगाडा नेण्याचे धाडस केले नव्हते आणि हे रणगाडे तरी कोणते, तर दुसर्या महायुद्धाअखेर ब्रिटनचे जुनाट म्हणून काढून टाकलेले.
लष्कराचे मुख्य विभाग
भूदलाचे मुख्यत: दोन विभाग असतात. पहिला झुंजी विभाग म्हणजे ‘कॉम्बॅट आर्म्स’. यात ’इन्फन्ट्री’, ’एअरबोर्न इन्फन्ट्री’, ’मॅकेनाईल्ड इन्फन्ट्री’, ’पॅराशूट रेजिमेंट’, ’आर्मर्ड कोअर’, ’एव्हिएशन कोअर’, ’आर्टिलरी’, ’एअर डिफेन्स आर्टिलरी’, ’इंजिनिअर्स कोअर’, ’सिग्नल कोअर’ असे उपविभाग असतात. दुसरा विभाग म्हणजे मदतगार विभाग किंवा ‘सपोर्टिंग सर्व्हिसेस’. यात ’आर्मी सर्व्हिस कोअर’, ’मेडिकल कोअर’, ’ऑर्डनन्स कोअर’, ’इलेक्ट्रिकल अॅण्ड मॅकेनिकल कोअर’, ’मिलिटरी पोलीस’ हे उपविभाग असतात. झुंजी विभागा इतकाच मदतगाार विभागही महत्त्वाचा असतो.
१९४७-४८च्या युद्धात हे दोनही विभाग समन्वयाने उभे ठाकले किंवा जनरल करिअप्पांच्या उत्कृष्ट नेतृत्वाने त्यांचा उत्तम समन्वय घडवून आणला. म्हणून सर्वप्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत, भारतीय सैन्याने पाकिस्तानी
सैन्याला खडे चारले. राजकीय नेतृत्वाने कचखाऊपणा केला नसता, तर भारतीय सेनानी काश्मीर पूर्ण मुक्त करूनच थांबले असते. १९६२च्या भारत-चीन युद्धात मदतगार विभागाला आपले काम नीटपणे करता आले नाही, त्याचा दोष राजकीय नेतृत्वाकडेच जातो. पण, त्याचा परिणाम असा झाला की, नेफा सरहद्दीवरच्या आपल्या सैनिकांना गरम कपडे, अन्नधान्य, दारूगोळा याचा नीट पुरवठाच झाला नाही, असो.
१९४७-४८च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारताच्या सरसेनापतीपदी तीन इंग्रज सेनापती येऊन गेले. जनरल क्लॉड ऑकिनलेक जाऊन, त्यांच्या जागी जनरल रॉब लॉकहार्ट आणि मग रॉय बुचर हे आले. खरे म्हणजे हे तिघेही उत्तम सेनापती होते. दुसर्या महायुद्धात पराक्रम गाजवलेले होते पण, अखेर ते इंग्रज होते. ते भारत सरकारच्या हुकुमाप्रमाणे नव्हे, तर लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांच्या हुकुमाप्रमाणे वागत होते आणि माऊंटबॅटन यांचे धोरण उघड-उघड भारतविरोधी व पाकिस्तानी पक्षपाती होते. अखेर तो पक्षपात सहन करणे सर्वोच्च राजकीय नेतृत्वालाही अशक्य झाले. जनरल रॉय बुचर यांना नारळ देण्यात आला आणि जनरल कोदंडेरा मदाप्पा करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती बनले. तो दिवस होता, दि. १५ जानेवारी १९४९.