दहशतवादाविरोधात दुहेरी निकष चालणार नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी ; शांघाय सहकार्य संघटनेने केला पहलगाम हल्ल्याचा एकमुखाने निषेध

    01-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रप्रमुख परिषदेच्या २५व्या बैठकीत सहभाग घेतला. या शिखर परिषदेत एससीओ विकास धोरण, जागतिक प्रशासन सुधारणा, दहशतवाद प्रतिबंध, शांतता व सुरक्षा, आर्थिक-आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली.

परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या सहकार्याच्या दृष्टीकोनाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारत सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन स्तंभांवर आधारित व्यापक कार्य पुढे नेऊ इच्छितो. शांतता, सुरक्षा व स्थैर्य हे प्रगती आणि समृद्धीचे मुख्य घटक असल्याचे सांगून मोदींनी सदस्य राष्ट्रांना दहशतवादाच्या सर्व स्वरूपांविरुद्ध ठोस व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले.

मोदींनी दहशतवादाला निधीपुरवठा आणि कट्टरतावादाविरुद्ध सामूहिकरीत्या कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पा़हलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला मिळालेल्या समर्थनाबद्दल त्यांनी सदस्य देशांचे आभार मानले. दहशतवादाशी लढताना कोणतेही दुहेरी निकष चालणार नाहीत. सीमा ओलांडून दहशतवादाला प्रोत्साहन देणारे व त्याला पाठिंबा देणारे देश जबाबदार धरले गेले पाहिजेत, असे मोदी स्पष्टपणे म्हणाले.

विकास व परस्पर विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी कनेक्टिव्हिटीचे महत्त्व सांगताना मोदींनी चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग यांसारख्या प्रकल्पांना भारताचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्टार्टअप्स, नवोन्मेष, युवक सशक्तीकरण आणि सामायिक वारसा या क्षेत्रांत संधी वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. लोकांमधील संवाद आणि सांस्कृतिक समज वाढवण्यासाठी एससीओ अंतर्गत एक ‘सभ्यतागत संवाद मंच’ स्थापन करण्याचा प्रस्तावही मोदींनी मांडला.

पंतप्रधानांनी एससीओच्या सुधारणा-अभिमुख अजेंड्याला पाठिंबा दर्शविला. संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रांचे त्यांनी स्वागत केले. संयुक्त राष्ट्रासह बहुपक्षीय संस्थांच्या सुधारासाठीही एससीओ देशांनी समान दृष्टिकोन स्वीकारावा, असे त्यांनी आवाहन केले.

शांघाय सहकार्य संघटनानेने (एससीओ) ने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोमवारी तीव्र शब्दांत निषेध केला. भारताच्या भूमिकेला समर्थन दर्शवत एससीओने स्पष्ट केले की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत कोणत्याही प्रकारचे "दुहेरी मापदंड" मान्य केले जाऊ शकत नाहीत. संघटनेच्या संयुक्त घोषणापत्रात दहशतवादाच्या सर्व प्रकारांची कठोर निंदा करण्यात आली आहे